विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:23+5:30

दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे.

Schools are deserted without students | विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड

विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड

ठळक मुद्देशाळा सुरु करण्यास शासनाची द्विधास्थिती : संमतीपत्र देण्यास पालकांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : शाळा म्हटले की, विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असतो. मात्र शाळेत एकही विद्यार्थी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांविना शाळा असे चित्र आजपर्यंतच्या इतिहासात घडले नाही असे मत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व नवीन पुस्तके घेवून शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. त्यासोबतच इतरही वर्गांचे विद्यार्थी उत्तीर्ण होवून पुढच्या वर्गात गेले असल्याने त्यांचाही शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस अत्यंत आनंदाचा असायचा. परंतु यावर्षी परिक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असत. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असायचा, मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेतील पहिल्या दिवसाच्या आनंदावर विरजन पडले आहे.
राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या शहरी भागासारखीच ग्रामीण भागातही असल्यामुळे पालकांचा आक्रोश व चिंतेमुळे शासनाला १ जुुलै पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शाळा-महाविद्यालयांना पालकांकडून संमतीपत्र घेण्यासबंधी सुचविले आहे. परंतु हमीपत्र देवून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास सक्त विरोध दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी म्हणतात की, जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करुन शाळा सुरु करावे अशी सूचना शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने परिपत्रक काढून गावातील शाळा इमारत सॅनिटाईज करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने स्विकारुन १४ व्या वित्त आयोगातील मंजूर निधी यासाठी खर्ची घालावे असे निर्देश आहेत. मात्र मुख्याध्यापक पत्र घेवून ग्रामपंचायतकडे जातात तेव्हा ग्रामपंचायत प्रशासन सॅनिटाईज करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे होईल असेही पालकांना वाटत आहे. शाळा मुख्याध्यापकांची व्यवस्था करण्यात ताराबंळ होत आहे. या परिस्थितीचा विचार करता विद्यार्थी विना शाळा ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Schools are deserted without students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा