सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच
By Admin | Updated: July 22, 2015 02:10 IST2015-07-22T02:10:09+5:302015-07-22T02:10:09+5:30
गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावणीच्या वेळेत फितूर होतात.

सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच
गोंदिया : गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावणीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश नुकताच काढला आहे. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या यादीसह संबंधित पोलीस ठाण्यांना आदेश येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीवर येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात भर पडणार आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण खटल्यांच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाचे ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी येण्याकरिता काही प्रकरणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालिन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते.
ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीदरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृहविभागाने ठरविले आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.
शिक्षण मंडळासह इतरही विभागाने नुकतेच या संदर्भातील आदेश सर्व शाळांतील मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या आवश्यकतेनुसार शाळेतील किंवा एका अधिकाऱ्याची नोडल आॅफीसर म्हणून नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक जवळच्या पोलीस चौकीत असणार आहेत. पोलिसांना त्याची गरज भासेल तेव्हा त्यांना तात्काळ कामातून मुक्तता द्यावी असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना पंचाची साक्ष महत्त्वाची असते पण त्यावेळी नेमलेले पंच प्रामाणिक राहतील याची खात्री नसते व पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षकही पंचनाम्यासाठी पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या आदेशामुळे शिक्षकासह इतरही कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे. (शहर प्रतिनिधी)