१० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:35+5:30
तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोना संकटाने अनेक उद्योगधंदे डबघाईस आले आहे. त्यावर शेतीत दगा मिळणे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : भात पिकाची रोवणी करण्यासाठी वाट पाहता-पाहता जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यातील जवळपास १० हजार हेक्टरवरील क्षेत्रात धान रोवणी रखडली आहे. आता पुढे पाऊस आला तरी हलक्या वाणाच्या धानाच्या उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जड धानाची रोवणी काही प्रमाणात आटोपली असली तरी फक्त ३६ टक्केच रोवणी झाले आहे.
तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोना संकटाने अनेक उद्योगधंदे डबघाईस आले आहे. त्यावर शेतीत दगा मिळणे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भातपिकाच्या हंगामाबाबत विचार केला तर जून व जुलै महिन्याच्या पावसावर खरीप हंगाम अवलंबून असतो. यामध्ये जून महिना पेरणीचा तर जुलै महिना रोवणीचा मानला जातो. परंतु मध्यला काळात एक दोनदा झालेल्या पावसाचा अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी पूर्णपणे खोळंबली आहेत. तालुक्यात ओलीत आणि कोरडवाहू क्षेत्र मिळून जवळपास १६ हजार हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. यापैकी १००-२०० हेक्टर पर्यंत क्षेत्रात आवत्या टाकल्या जातो. बाकी मोठ्या प्रमाणावर नर्सरीची रोवणी करुनच भात लागवड केली जाते. आतापर्यंत तालुक्यात फक्त ५ हजार ९३१ हेक्टरवरच धान रोवणी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीत क्षेत्राची शेत जमीन आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल व विहिरीचे साधन त्यांनीच रोवणी केलेली आहे. यात एकमेकाला मदत करीत असताना ओलीत क्षेत्रव्यतिरीक्त ५०० हेक्टरवर कोरडवाहू क्षेत्रात ही धान रोवणी झालेली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी उशीरा पोहचले किंवा पऱ्हे उशीरा आले असे शेतकरी सध्या रोवणी करीत आहे. एकंदरीत विचार केला तर तालुक्यात अशीच परिस्थिती राहिली तर जेमतेम सात हजार हेक्टरपर्यंतच रोवणी पूर्ण होऊ शकेल.
शेतकऱ्यांचा अंदाज चुकला
दरवर्षी मृग नक्षत्र बहुतेक कोरडे जाते किंवा मृगाच्या उत्तरार्धात थोड्याफार मृगधारा बरसतात. परंतु यंदा मृृग नक्षत्राच्या आरंभी आणि मध्ये एक दोन वेळा पावसाने सामान्य हजेरी लावली. पुढे ही पाऊस समाधानकारक पडेल या अपेक्षेने शेतकºयांनी बऱ्याच प्रमाणात मृगातच पऱ्हे टाकले.त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिला आठवड्यात रोवणी सुरु होणे आवश्यक होते. परंतु जुलै महिना संपत असून सुद्धा पाऊस आला नाही त्यामुळे शेतकरी फसला.
पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर
हलक्या धानाची नर्सरी पेरणीपासून २० ते ३० दिवसात रोवणी झालेली उत्तम मानली जाते. परंतु हलक्या वाणाची नर्सरी दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाली असून रोवणीसाठी मुदतबाह्य झालेली आहे. अशात आता पुढे या नर्सरीची रोवणी केली तरी उत्पादनावर मोठा फटका बसेल एवढे नक्की.
हवामान खात्याचा अंदाज फोल
यंदा हवामान खात्याने दिलेला अंदाज पूर्णत: फोल ठरताना दिसत आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल म्हणत असताना आतापर्यंत निम्मा पाऊसही पडला नाही. आतापर्यंत ६०० मिमी.पाऊस अपेक्षित होते.परंतु आतापर्यंत तालुक्यात २९८ मिमी. पाऊस पडला आहे.