नागतलाव मार्गावर पडला खड्डा
By Admin | Updated: May 18, 2017 00:06 IST2017-05-18T00:06:14+5:302017-05-18T00:06:14+5:30
खातीया-बटाना-आंभोरा नागतलाव मार्गावर पडलेल्या खड्यामुळे केव्हा अपघात होण्यात शक्यता नाकारता येत नाही.

नागतलाव मार्गावर पडला खड्डा
लोकप्रतिनिधी उदासीन : सहा महिन्यांपासून संबंधित विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
खातीया : खातीया-बटाना-आंभोरा नागतलाव मार्गावर पडलेल्या खड्यामुळे केव्हा अपघात होण्यात शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पडलेल्या या खड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन खड्डा बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात येण्यासाठी खातीया, बिरसी, परसवाडा, झिलमिली, पांजरा, छिपीया, कामठा या गावाचे अनेक नागरिक, मजूर वर्ग याच रस्त्याने ये-जा करतात. हा मार्ग शहरात येण्यासाठी सरळ आहे. याच मार्गाने सर्व लोक आवागमन करीत असतात. रात्रीच्या वेळे आपले काम आटोपून याच रस्त्याने ते परतात. मात्र या खड्यामुळे कधीही अपघात घडू शकतो. अनेक वेळा अपघातही घडले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जिवित हाणी झाली नाही. या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट तर संबंधित विभाग पाहत नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे.
मागील पाच ते सहा महिन्यापासून हा खड्डा पडला आहे. काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. पावसामुळे हा खड्डा धोकादायक होऊ शकतो.
परिसरातील काही शेतकरी याच रस्त्याने आपल्या शेतात बैलगाडी घेवून जातात. या खड्यामुळे कधीही बैलबंडी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.