उघड्यावरील पदार्थ देत आहेत आजाराला आमत्रंण
By Admin | Updated: June 22, 2014 00:04 IST2014-06-22T00:04:01+5:302014-06-22T00:04:01+5:30
पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना

उघड्यावरील पदार्थ देत आहेत आजाराला आमत्रंण
गोंदिया : पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना आपण कदाचीत आजाराला आमत्रंण देत आहोत, ही बाब विसरतो. यामुळेच पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थांच्या सेवनामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कावीळ, अतीसार, कॅलरा व पोटाच्या आजारांची लागण होते. यालाही काही प्रमाणात अस्वच्छता व उघड्यावरील पदार्थांचे सेवन कारणीभूत आहे. नागरिक देखील आपल्या धावपळीत व हौस भागवायची म्हणून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचे सर्रासपणे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून व स्वच्छतेबाबत नियमांचे पालन केले जाते आहे की नाही याची खबरदारी घेत नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुकानातून केवळ १० रुपयात घेतलेला नास्ता आजाराला आमत्रंण देऊ शकतो या बाबीकडे नागरीक दुर्लक्ष करीत असतात यातूनच आपण या विविध आजारांना आमत्रंण देत असतो.
जिल्ह्यात शेकडो हॉटेल व रेस्टॉरेंट आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल व उपहारगृहांना परवाने देताना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन हॉटेल व उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येतो. नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम २७४, २७५ नुसार खानावळ, उपहारगृह, हॉटेल चालविणाऱ्या संचालकाकडून केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यांच्यावर या कलमान्वये कारवाई करण्याची तरतुद आहे. इंडियन पिनल कोड च्या कलम ७२ व ७३ नुसार खराब मिठाई व मानवी शरिरास अपायकारक असणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. हे नियम जरी असले तरी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील भाजीबाजार असो की मुख्य रस्त्यांच्या बाजुला काही लोकांनी थाटलेले छोटेसे उपहागृह असो. उपहारगृह चालकांना परवाना घेताना ज्या नियम व अटींचे पालन करण्यास सांगण्यात आले होते त्या नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे मात्र या व्यावसायीकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केले जात असल्याचे चित्र दिसून येते.
शहरात बहुतेक ठिकाणी घाणीच्या साम्राज्यात काही उपहार गृह व टपऱ्यावरील दुकानादार पदार्थ विकत असल्याचे दिसून येते. या व्यावसायीकांनी स्वच्छतेच्या बाबींकडे पूर्णत; दुर्लक्ष केले असल्याने या पदार्थांचे सेवन करणारे नागरिक मात्र विविध आजाराला बळी पडत आहे. सर्व उपहारगृह व हॉटेलात नियमांचे उल्लघंन केले जात असताना संबंधीत विभागाने मात्र अद्यापही कुठल्याही उपहारगृह चालकावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
पावसळ््यात तर डास व माश्यांचा प्रकोप वाढतो. डास व माश्या आजारांचे वाहक असून पावसाळ्यात खानपानाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. स्वच्छता न पाळल्यास खानपानातून विविध आजार बळावतात. मात्र हॉटेल वाल्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. त्यांना फक्त तयार केलेले खाद्य पदार्थ विकायचे असल्याने ते या भानगडीत पडत नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याकडे अन्न व औषध विभाग तसेच नगर परिषदेच्या अधिकाऱ्याचे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)