६३० कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट
By Admin | Updated: April 23, 2016 02:05 IST2016-04-23T02:05:35+5:302016-04-23T02:05:35+5:30
जिल्ह्यात नव्या खरीप व रबी हंगामाकरिता पिककर्जाचे उद्दिष्ट देण्यासह जुन्या कर्जवाटपाचा आढावा शुक्रवारी ...

६३० कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट
जिल्हाधिकारी : तालुका स्तरावर पीककर्ज वाटपासाठी शिबिरे घेणार
वर्धा : जिल्ह्यात नव्या खरीप व रबी हंगामाकरिता पिककर्जाचे उद्दिष्ट देण्यासह जुन्या कर्जवाटपाचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. येत्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्याला ६३० तर रबी हंगामाकरिता ७० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याचवेळी गत आर्थिक वर्षात कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांचा सत्कार जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्ष २०१६-१७ चे पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता तालुका स्तरावर पीक कर्ज वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पीक कर्ज वितरण आढावा बैठक प्रत्येक आठवड्यात संबंधीत बँक अधिकारी, कृषी अधिक्षक व इतर संबंधीत विभागाच्या सहकार्याने घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना केल्या. पीक कर्जवाटपाचे उदिष्ट ३१ मे २०१६ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वर्ष २०१५-१६ मध्ये खरीपाकरिता ५४५ कोटी तर रब्बीकरिता ६९ कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ते शतप्रतिशत पूर्ण करणाऱ्या उत्कृष्ट बँक अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशासकीय पत्र देवून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाची माहिती सभेमध्ये दिली. आढावा सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. स्रेहल बन्सोड यांच्यासह विविध बँकेचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.(प्रतिनिधी)