प्रचार-प्रसिद्धीसाठी निधीची मागणीच नाही !
By Admin | Updated: October 2, 2015 06:33 IST2015-10-02T06:33:53+5:302015-10-02T06:33:53+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प शुक्रवारपासून पर्यटकांना वनभ्रमंतीसाठी खुला होणार आहे. वन्यजीवांची माहिती

प्रचार-प्रसिद्धीसाठी निधीची मागणीच नाही !
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प शुक्रवारपासून पर्यटकांना वनभ्रमंतीसाठी खुला होणार आहे. वन्यजीवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठीच ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताहसुद्धा साजरा केला जात आहे. मात्र या व्याघ्र प्रकल्पाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी शासनाकडे निधीची मागणीच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मार्केटिंगच नाही तर पर्यटक या व्याघ्र राखीव क्षेत्राकडे आकर्षित होणार कसे, आणि जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार कशी? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
सन २०१३ मध्ये राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, कोका अभयारण्य असे एकूण चार अभयारण्य व एक राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. हे क्षेत्र विविध वनस्पती, विविध प्राणी-पक्षी व अनेक सरपटणारे प्राणी नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र वन्यजीव विभाग प्रचार-प्रसिद्धीवर पुरेसा खर्च करीत नसल्याने पर्यटकांची संख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात असायला हवी, तेवढी दिसून येत नाही. योग्य प्रकारे नियोजन करून प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली तर निश्चितच येथे पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात जावू शकते. पण अद्यापही वन्यजीव विभागाला व्याघ्र प्रकल्पाच्या मार्केटिंगची गरज वाटत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची प्रचार-प्रसिद्धी केवळ केवळ वार्षिक २० ते २५ हजार रूपयांत गुंडाळली जाते, अशी माहिती खुद्द वनाधिकाऱ्यांनीच दिली. एवढ्याशा अल्प निधीत केवळ काही पोस्टर व लिफलेट प्रकाशित केल्या जातात. याव्यतिरिक्त इतर प्रसार माध्यमांद्वारे कोणतीच प्रसिद्धी केली जात नाही. विशेष म्हणजे पाावसाळ्यात वनभ्रमंती कोणत्या तारखेपासून बंद होणार याची माहिती देण्यास पुढाकार घेणारा वन्यजीव विभाग वनभ्रमंती आता सुरू होणार हे सांगण्यासाठी मात्र पुढाकार घेत नाही. एवढेच नाही तर वन्यजीव सप्ताहाचीही माहिती या विभागाला बातमीरूपाने प्रसिद्ध करावीशी वाटली नाही. कोणत्या प्रकारच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी वरिष्ठ स्तरावर स्थानिक वन्यजीव विभागाकडून निधीची मागणी केली जात नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार करण्यात आला तर निश्चितच विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आकर्षित होवू शकतात, यात शंका नाही. (प्रतिनिधी)
जनवन योजनेत प्रकल्पातील १० गावे
यंदापासून शासनाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या दोन किमी अंतरावरील गावांचा विकास करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील १५० गावांचा समावेश असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील व बफर झोनमधे मोडणाऱ्या गावांचा समावेश आहे.
यात गोंदिया जिल्ह्यातील केवळ तीनच गावांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यालगतच्या सात गावांचा समावेश आहे. डोंगरगाव (कोहमारा) क्षेत्रातील बोवाटोला व नवेगाव राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील रामपुरी व येलोडी या दोन गावांचा समावेश आहे.
४कोका अभयारण्याजवळील सर्वेवाडा, टेकेपार, इंजेवाडा, डोंगरदेव, किटाळी, बोंडे व सितेपारचा समावेश आहे. या योजनेचा मायक्रो प्लॅन पाच वर्षांसाठी असून गावांचा विकास, सुधारणा, सिंचन, कृषी आदी सर्व विभागांची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार अनुदानही ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नागझिरा-नवेगाव क्षेत्राबद्दल पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी पोस्टर्स, लिफलेट प्रकाशित केले जातात. त्यासाठी वर्षाला २०-२५ हजार रुपयांचा आमचा बजेट असतो. पण प्रसार माध्यमांमधून जाहीरातीच्या स्वरूपात प्रचार-प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही विभागाकडे कधी निधीची मागणी केली नाही. आता खऱ्या अर्थाने व्याघ्र प्रकल्पाचे काम सुरळीत झाल्यामुळे पुढील वर्षाकरिता निधीची मागणी करू.
- एस.एस.कातोरे
विभागीय वनाधिकारी, वन्यजीव विभाग, गोंदिया