रंगकर्मी कलावंतांचे तीन टप्प्यांत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:54+5:302021-07-28T04:29:54+5:30
गोंदिया : मागील दीड वर्षात रंगकर्मी कलावंतांना कोरोना साथीचा आणि महागाईचा फटका बसला आहे. बेरोजगारीमुळे अनेकांचे बेहाल झाले आहेत, ...

रंगकर्मी कलावंतांचे तीन टप्प्यांत आंदोलन
गोंदिया : मागील दीड वर्षात रंगकर्मी कलावंतांना कोरोना साथीचा आणि महागाईचा फटका बसला आहे. बेरोजगारीमुळे अनेकांचे बेहाल झाले आहेत, तर अनेकांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कलाकार संघटनांनी राज्यातील महाआघाडी सरकारला निवेदन दिले आहे. या माध्यमातून कलाकारांच्या समस्या व मागण्या मांडण्यात आल्या; परंतु शासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.
कोरोनाकाळात रंगकर्मी कलावंत व त्यांचे कुटुंबाचे बेरोजगारी उपासमारीने बेहाल झाले आहेत. पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार असो किंवा कोणतेही राजकीय, गैर राजकीय समारंभ कार्यक्रम असो रंगकर्मी कलावंत विविध कार्यक्रमांची शोभा वाढवीत असतात. कला रंगमंच कार्यक्रमांवर अवलंबून असलेले गोरगरीब कलावंतांच्या लेकरांवर कोरोनाकाळात काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. मात्र, याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बेरोजगारी, महागाईमुळे त्रस्त रंगकर्मींनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोककला, वाद्यवृंद, नाटक, सिनेमा इत्यादी क्षेत्रातील संघटना राज्यस्तरावर जिल्हा मुख्यालयात तीन टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार आहे. २९ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन याची सुरुवात होईल. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पुढचा दुसरा टप्पा ५ ऑगस्टला व तिसरा टप्पा ९ ऑगस्टला होईल. संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेव, दिलीप कोसरे, दिनेश फरकुंडे, सरस्वती संगीत समूहाचे तिलक दीप, आशिष देशभ्रतार, राजू चौरसिया, राजू सोनी, महेश लांजेवार, पराग मेश्राम, नीरज रहांगडाले, तबरेज खान यांनी कळविले आहे.