शाळेचा मुहूर्त नसतानाही फी साठी संदेशबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:45+5:30
कोरोनाचा विळखा सैल न होता अधिकच घट्ट होत चालला आहे. एकीकडे शासनाकडून लहान मुले व वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा व त्यांना जपण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र शाळा उघडण्यासाठी शाळां व शासनाकडून वेगवेगळे निकष व नियम लावले जात असल्याचे दिसत आहे.

शाळेचा मुहूर्त नसतानाही फी साठी संदेशबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या धास्तीत असलेल्या पालकांकडून मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे स्पष्ट सांगीतले जात आहे. अशात मात्र शाळांचा ठोका कधी वाजणार याचा मुहूर्त अद्याप स्पष्ट झालेला नाही. तरिही शाळांकडून पालकांना फी साठी संदेश पाठविणे सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, आमच्याकडून अभ्यास सुरू झाल्याचे दाखवून देण्यासाठी ऑनलाईन अभ्यासाचे कारण पुढे केले जात आहे.
कोरोनाचा विळखा सैल न होता अधिकच घट्ट होत चालला आहे. एकीकडे शासनाकडून लहान मुले व वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा व त्यांना जपण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र शाळा उघडण्यासाठी शाळां व शासनाकडून वेगवेगळे निकष व नियम लावले जात असल्याचे दिसत आहे. कोरोनाने अवघे देश धास्तावलेले असतानाच शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळेच २६ जूनपासून शाळेचा ठोका वाजणार असे सांगीतले जात होते. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी १५ आॅगस्टनंतर निर्णय घेतला जाणार असे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही अद्याप संभ्रम कायमच आहे. शाळा सुरू करण्यासाठी शासन व शाळा संचालकांचे प्रयत्न सुरू असतानाच मात्र पालकांनी जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही किं वा कोरोनावर औषध येत नाही तोवर मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात मात्र कोट्यवधींच्या घरात असलेला हा व्यवसाय सांभाळून घेण्यासाठी शासन व शाळांकडून नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. यात आमच्याकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जात असल्याचे दाखवून देण्यासाठी आॅनलाईन अभ्यास घेतला जात आहे. शिक्षिकेची एक क्लिप पालकांच्या मोबाईलवर टाकून आगळ््यावेगळ््या पद्धतीचा अभ्यास घरबसल्या सुरू झाला आहे. यामोबदल्यात मात्र आता शाळांकडून पालकांना फी जमा करण्यासाठी मॅसेजेस केले जात आहेत. आजघडीला खासगी नोकरी करणारे व व्यापारी दोघांचीच स्थिती गंभीर आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यापारही ठप्प पडून आहेत. अशा कठीण समयी शाळांकडून मात्र आपल्या फी साठी मॅसेजबाजी केली जात आहे. यात मात्र शासनाकडून शाळांनाही पुरेपुरे पाठींबा दिसून येतो. यामुळेच शाळा संचालकांचे मनसुबे अधिक वरचढ होत चालले असून फी न भरल्यास मुलाचे एडमिशन रद्द केले जाणार इतपर्यंतचे मॅसेज पालकांना पाठविले जात आहे.
तेवढ्या महिन्यांची फी कशाला
आता शाळा १५ ऑगस्ट नंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यातही परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक आहेच. म्हणून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर किंवा कोरोनावर औषध मिळाल्यावरच शाळा सुरू करण्याची मागणी आहे. अशात मात्र पूर्ण वर्षाची फी न घेता जेवढे महिने शाळा सुरू राहिल तेवढीच फी घ्यावी. शाळा बंद असलेल्या महिन्यांची फी कशाला द्यायची असा प्रश्न पालक करीत आहेत.
पुस्तकांची दुकाने झाली सुरू
काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासाचा प्रयोग सुरू केला असून सोबतच पुस्तकांची दुकानदारीही थाटली आहे. अभ्यास करण्यासाठी पुस्तक लागणार असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करून पुस्तक खरेदी करण्याचे सुरक्षात्मक मॅसेज शाळांकडून पाठविले जात आहे.यावरून शिक्षणाचा व्यापार करणारे शाळा संचालकांना कुणाच्याही परिस्थितीशी काहीच घेण-देण ठेवणारे नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा त्यांना आपल्या कमाईचीच जास्त चिंता असल्याचेही पालक आता बोलत आहेत.