महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत यावर्षीही पुरस्कार योजना
By Admin | Updated: June 18, 2014 00:16 IST2014-06-18T00:16:43+5:302014-06-18T00:16:43+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यावर्षीही गावांप्रमाणे बातमीदारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २० जून २०१४ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत यावर्षीही पुरस्कार योजना
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यावर्षीही गावांप्रमाणे बातमीदारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २० जून २०१४ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया येथे प्रवेशिका पाठविण्यचे आवाहन करण्यात आले. तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात २ मे २०१३ ते १ मे २०१४ या कालावधीत प्रसिध्द झालेले वृत्त, वृत्तकथा व लेख आदी साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
राज्यात महात्मा तंटामुक्त गाव मोहिम २००७ पासून सुरू करण्यात आली. या मोहिमेची व्याप्ती व महत्व लक्षात घेता लोकसहभागाची चळवळ होण्याच्या दृष्टीने शासनाने विशेष प्रयत्न केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकारात्मक पत्रकारितेचा विचार प्रसार माध्यमांनी जनसामान्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहचविण्यासाठी बातमीदारांंना पुरस्कार देण्याची योजना शासनाने आखली. त्यानुसार जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार २५ हजार, व्दितीय पुरस्कार १५ हजार, तृतीय पुरस्कार १० हजार, विभागस्तरावर प्रथम पुरस्कार १ लाख, व्दितीय पुरस्कार ७५ हजार, तृतीय पुरस्कार ५० हजार, राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार २ लाख ५० हजार, व्दितीय पुरस्कार १ लाख ५० हजार तर तृतीय पुरस्कार १ लाख रुपयाचा देण्यात येते.
पुरस्कारासाठी या कालावधीत वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटो फिचर अशा साहित्याचा विचार करण्यात येते. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार पात्र असतील. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द झालेल्या साहित्य पुरस्कारासाठी पात्र राहील. ज्या स्तरावरील पारितोषिकेसाठी अर्ज करावयाचा आहे. त्यास्तरावरील समितीच्या सदस्य सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकेसाठी अर्ज करता येईल. विहीत मुदतीत वैयक्तीकरित्या केलेले अर्ज विचारात घेण्यात येतील. एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार सहभागी होवू इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करून सबंधीत संपादक सबंधित समितीकडे पाठवतील.
वृत्तपत्र बातमीदारांचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द झाले असेल तर त्यासंबधीचा एकत्रित अर्जापैकी कोणतेही एक अर्ज संपादक सबंधित समितीकडे पाठवतील. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सबंधित जिल्ह्यातून प्रसिध्द होणारे वृत्तपत्र, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले साहित्य विचारात घेण्यात येईल. माहिती खात्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ,ब,क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यातून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच पारितोषिकासाठी विचार करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागस्तरावरील पारितोषिकासाठी आपोआप नामनिर्देशन होईल. अर्जदारांनी परिशिष्ठ ब मध्ये विहीत नमुन्यातील आपला अर्ज तीन प्रतीत समित्याकडे येत्या २० जून २०१४ पूर्वी पोहोचेल असा पाठवावे गोंदिया जिल्ह्यातील बातमीदारांनी जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया येथे परिपूर्ण प्रवेशिका सादर कराव्यात, (तालुका प्रतिनिधी)