आयुष्य सरले, पण डोईवरचा हंडा उतरलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:23 IST2019-05-14T23:23:25+5:302019-05-14T23:23:54+5:30
अख्ख आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा किव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.

आयुष्य सरले, पण डोईवरचा हंडा उतरलाच नाही
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : अख्ख आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा किव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील गौरीटोला हे गाव. या गावाला जाण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधे रस्तेही नव्हते. यावेळी पाण्याची समस्या बिकट आहे. सातशे लोकसंख्या असलेल्या या गावात खासगी १२ विहीर व ५ बोअरवेल आहेत. मात्र विहिरींना जानेवारी महिन्यापासूनच पाणी नाही. तर बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे.आता शेतातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी आणून कसेबसे उन्हाळा काढायचे असे धोरण गावकऱ्यांनी अवलंबविले आहे. येथील पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेवून खडतर पायपीट करावी लागत आहे. तिल्ली ग्रामपंचायत अधिनस्थ गौरीटोला हे गाव येते. मात्र येथील लोकांना भौतिक सुविधांचाही दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाºया घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन कधी जागेल असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. प्रशासन आता तरी याची दखल घेणार का याकडे लक्ष आहे.
पक्के रस्ते नाहीत
पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या विधानसभा क्षेत्रात गौरीटोला हे गाव आहे. पण बडोले यांनी या गावासाठी पाणी सोडा साधे रस्त्याचीही सोय करुन दिली नाही. गेल्या अनेक वर्षापासून या गावासाठी दर्जेदार रस्त्याची मागणी आहे. मात्र प्रशासनाच्या कायम दुर्लक्षित धोरणामुळे गौरीटोलावासीय आजही उपेक्षितांचे जीणे जागत आहे.जेमतेम १००-१५० कुटुंबीय वास्तवाला असलेल्या या गावात भौतिक सुविधा नसल्यामुळे काही गावकऱ्यांनीही गाव सोडल्याचे ऐकीवात आहे.