पाईपलाईनच्या स्वच्छतेवर लाखो लिटर पाण्याची नासाडी
By Admin | Updated: June 6, 2014 00:03 IST2014-06-06T00:03:40+5:302014-06-06T00:03:40+5:30
पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर

पाईपलाईनच्या स्वच्छतेवर लाखो लिटर पाण्याची नासाडी
गोंदिया : पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर विभागाने लाखो लीटर पाण्याचा नासाडा सुरू केला. आहे. गुरूवारी
(दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीत दुपारी हा प्रकार दिसून आला. सर्वत्र पाण्यासाठी धावपळ सुरू असताना येथे मात्र पाण्याचे लोट वाहून जात असल्याने नागरिकांनी या विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.
शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. कोट्यवधीच्या या योजनेचे अद्याप पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू आहे. एकतर या पाईप लाईनसाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात लोकप्रतिनिधी व विभाग येत्या दोन महिन्यात योजना सुरू करू असे सांगत वेळ मारून नेत आहेत. त्यांच्या या आश्वासनामुळे आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटून गेला व शहरवासीयांना ही योजना फक्त गाजर वाटू लागली आहे. आजही पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू असल्याने या योजनेच्या कामास अजून किती दिवस लागणार हे सांगणे कठीण आहे.
असे असताना गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीतील पाईपलाईनमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले. या पाईपमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे रस्त्याचे जात असलेल्यांनी बघितले. अगोदरच रखरखता उन्हाळा सुरू असून पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यातच काय तर शहरातही दिसून येत आहे. अशात याविभागाकडून पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे बघून नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे जाणवत होते.
या घटनेची माहिती मिळताच मजीप्राचे उपविभागीय अभियंता विवेक बन्नोरे, शाखा अभियंता दांडेकर कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाईपलाईनच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे सांगत हलक्यावर हा प्रकार घेतला. मात्र या स्वच्छतेवर लाखो लीटर पाणी नालीतून वाहून जात असल्याचे चित्र इतरांना राग अनावर करणारे होते. एकंदर पाईपच्या स्वच्छतेवर लाखो लीटर पाण्याचा अपव्यय विभागाकडून करण्यात येत असल्याने दुसर्यांना पाणी वाचविण्याचा संदेश देणार्या विभागालाच पाण्याचे काही मोल नसल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)