चिचटोल्यात एकच दिवाळी
By Admin | Updated: November 2, 2016 00:28 IST2016-11-02T00:28:56+5:302016-11-02T00:28:56+5:30
दिवाळीचा सण हा आपल्या देशातील सर्वात मोठा व महत्वाचा सण मानला जातो. हा सण भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा

चिचटोल्यात एकच दिवाळी
पशुपालन व धानशेती : अनेकदा उद्ध्वस्त होऊनही गाव नवीन ऊर्जेने ओतप्रोत
विजय मानकर सालेकसा
दिवाळीचा सण हा आपल्या देशातील सर्वात मोठा व महत्वाचा सण मानला जातो. हा सण भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा प्रतिक आणि चार ते पाच दिवस साजरा होणारा सण आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही चार-पाच दिवस महत्वाचे असतात. परंतु एखाद्या गावात हा सण फक्त एका दिवसात साजरा होत असून तीन-चार दिवसांचे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम एकाच दिवसात संपन्न होत असतील तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणारा चिचटोला (सावंगी) हे गाव यातीलच एक प्रतीक आहे. या गावात शेकडो वर्षापूर्वीपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच संपूर्ण दिवाळीचा सण साजरा होतो. याच दिवशी गोवर्धन पूजा, गायगोधन, गाय-म्हशीची मिरवणूक काढून गायी खेळविण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. लगेच दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण गावातील लोक आपल्या शेतीच्या कामाला जोमाने लागतात व धानाची कापणी आणि मळणीत सहपरिवार स्वत:ला झोकून देतात.
दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागासाठी शेतकरी वर्गात सर्वात महत्वाचा सण असतो. पीक, पाणी चांगले झाल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. दिवाळीचे सर्व पाच-सहा दिवस आनंदमय व पारंपरिकरित्या साजरे केले जातात.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी गोवत्स पूजनाला महत्व असतो. दुसरा दिवस हा धनत्रयोदशीच्या असून या दिवसी धनाची पूजा तसेच भगवान धन्वतंरी पूजन करून साजरा केला जातो. तसेच या दिवशी नवीन दागिने व वस्त्र खरेदीला सुध्दा महत्व दिला जातो. तिसरा दिवस नरक चतुर्दशी असून या दिवशी पहाटेच्या अभ्यंग स्नान आणि दिपावली साजरी होऊ लागते. या दिवसापासून विविध पूजनाला सुरूवात होते. दिव्यांची आरास व जगमग सर्वत्र सुरूवात होते. चौथा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा म्हणजेच मोठी दिवाळी भगवान रामाने लंका विजय प्राप्त करून आपल्यावर अयोध्येत याच दिवशी दिवाळी साजरी केली होती. तेव्हापासून हा सण साजरा होतोे.
असे म्हणतात पाचवा दिवस हा गोवर्धन पूजा व दिपावली पाडवा हा बलिप्रतिप्रदा म्हणून साजरा करतात. या दिवशी गावागावात आखरावर सर्व गावकरी आपल्या सर्व जनावरांसह एकत्रित होतात. गायगोधन व गायी खेळविण्याचा कार्यक्रम साजरा करतात. ग्रामीण भागात हा दिवस सर्वात महत्वाचा मानला जातो. महाभारत काळात कृष्णाने याचदिवशी गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलून इंद्राच्या अतिवृृष्टीपासून गावातील लोकांना व जनावरांना वाचविले होते, असे म्हणतात. त्यांचे प्रतिक म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
तसेच सहावा दिवस हा भाऊबीज साजरा करण्याचा दिवस. यादिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व दिर्घायुष्याची कामना करते. ग्रामीण भागात याच दिवसापासून मंडई उत्सवाची धूम सुरू होते. एकंदरीत सहा दिवसाचा सण साजरा करण्यासाठी कमीत कमी १५ दिवसांपासून सर्व लोक तयारीला लागतात. सहा दिवस सण साजरा करतात. परंतु चिचटोला या गावात सहा दिवसांचा सण एकाच दिवशी साजरा करून एका दिवसाची दिवाळी साजरी करून एवढ्या मोठ्या सणासाठी फक्त एक दिवस संपूर्ण देतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वच कार्यक्रम पूजन करून पाडव्याला आपल्या शेतीच्या कामात रमतात.
झालिया या गावापासून तीन किलोमीटर दक्षिणेकडे असलेला चिचटोला हा गाव वाघ नदी आणि कुआढास नाल्याच्या संगमावर वसलेला आहे. या गावाला अनेकवेळा पुराने ग्रासले असून पुरामुळे अनेकवेळा हे गाव उध्वस्तसुध्दा झाले. परंतु लोकांनी प्रत्येकवेळी येथे आपला नवीन रैनबसेरा स्थापित करून नव्याने जीवन जगण्याला सुरूवात केली. चिचटोला गावचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीपूरक प्राणी पालन. या गावात कष्टाळू शेतकरी वर्ग असून धानाची शेती करीत गाई, म्हशी पाळणे तसेच काही प्रमाणात इतर पीक घेणे तसेच भाज्या उत्पादन करण्यात या गावातील लोक प्रवीण आहेत. त्यामुळे या गावातील लोक वर्षभर आपल्या शेतीच्या कामातच गुंतलेले दिसून येतात. आपल्या कामातच आपले दैवत शोधतात. यामुळे येथील लोक दिवाळीचा फक्त एक दिवस सर्व कार्यक्रम आटपून कामाला पुन्हा लागतात. गावातील काही वयस्कर लोकांना एकाच दिवसाच्या दिवाळीबद्दल विचारले असता त्यांनी या गावात एकाच दिवशी दिवाळी साजरी करण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली, याची नेमकी माहिती कोणीच देऊ शकत नाही.