बस जळण्यामागील रहस्य कायम
By Admin | Updated: December 14, 2015 02:11 IST2015-12-14T02:11:35+5:302015-12-14T02:11:35+5:30
गोंदियावरून धापेवाडा मार्गे तिरोड्याला जाणाऱ्या तिरोडा आगाराच्या एसटी बसला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ...

बस जळण्यामागील रहस्य कायम
इनव्हेस्टिगेशन : मध्यवर्ती कार्यालयातून अधिकाऱ्यांची चमू
गोंदिया : गोंदियावरून धापेवाडा मार्गे तिरोड्याला जाणाऱ्या तिरोडा आगाराच्या एसटी बसला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रविवारी (दि.६) सायंकाळी ६ ते ७ वाजतादरम्यान अचानक आग लागली. मात्र बसला आग कशी लागली? याचे रहस्य अद्यापही कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून दोन अधिकाऱ्यांची चमू आली. या चमूने आपला तपासही केला. मात्र घटनेमागील कारण ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविणार असल्याने त्यांच्या तपासात काय निष्कर्ष निघाला, हे कळू शकले नाही. या चमूमध्ये नागपूर हिंगणा येथील कार्यशाळा अधीक्षक मधूकर सोनोने व अमरावती येथील यंत्रचालक अभियंता राजू अडोलकर यांचा समावेश आहे.
एसटीच्या प्रत्येक बसमध्ये आग विझविणारे यंत्र असते. ज्या बसला आग लागली होती, त्या बसमध्येसुद्धा आग विझविणारे दोन यंत्र होते. मात्र चालकाला ते यंत्र हाताळता न आल्याने किंवा अग्निशमन यंत्र कसे चालवावे हे त्याला न समजल्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळू शकले नाही, असा प्राथमिक अंदाज एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ज्या बसला आग लागली, त्या बसच्या चालकाच्या सीटमागे वाहकाचा तिकीट ट्रे, टिफीन डबा आदी वस्तू ठेवल्या होत्या. सदर बस १२० किमी. चालली होती. त्यामुळे त्या वस्तू वायरच्या संपर्कात येवून वायर व वस्तूंच्या घर्षणामुळे ठिणगी उडाली व आग लागली. तसेच चालकाला आग विझविणाऱ्या यंत्रांना हाताळता न आल्यानेच आगीचा भडका उडून बस जळली व काही प्रवाशी जखमी झाले, असा प्राथमिक अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र इन्व्हेस्टिगेशन करणारी चमू आता आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणता अहवाल सादर करते, यावर कारणांची सत्यता अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
यंत्राची एका वर्षाची मुदत
एसटीच्या प्रत्येक बसमध्ये आग विझविणारे यंत्र असतेच. आगारातून बस निघण्यापूर्वी बसमधील टूलकिटची नोंदणी रजिस्टरमध्ये होते. अग्निशमन यंत्राविणा बस नेणे नियमाविरूद्ध आहे. अग्निशमन यंत्र नसले तर आरटीओ पासिंगही होत नाही. नवीन बसमधील आग विझविणाऱ्या यंत्राची व्हॅलिडिटी दोन वर्षांची असते. तर जुन्या बसमधील यंत्राची मुदत एक वर्षाची असते. गोंदिया आगारासह भंडारा विभागातील आग विझविणाऱ्या यंत्रांमध्ये रिफील मार्च महिन्यातच करण्यात आली आहे. रिफीलसाठी एसटीच्या विभागस्तरावर निविदा काढल्या जातात. त्यानंतर संबंधित कंपन्यांना तसे टेंडर दिले जाते.