ग्रामस्थांमध्ये जागली स्वच्छतेची प्रेरणा
By Admin | Updated: January 3, 2015 23:05 IST2015-01-03T23:05:42+5:302015-01-03T23:05:42+5:30
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली.

ग्रामस्थांमध्ये जागली स्वच्छतेची प्रेरणा
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली. आता दर महिन्यातून एकदा संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने चिरेखनीच्या ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा जागली, असे मत चिरेखनी येथील रहिवासी व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे यांनी व्यक्त केले.
दर महिन्यात स्वच्छता अभियान राबवू व इतर गावांना चिरेखनी गावाच्या स्वच्छतेची प्रेरणा घ्यावीच लागेल, असे आदर्श चिरेखनी गाव बनवू, असा निर्धार रमेश टेंभरे यांच्यासह गावकऱ्यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली. यानंतर वार्ड-३, नंतर वार्ड-१ व यानंतर वार्ड-२ मध्ये स्वच्छता करून सर्व ग्रामस्थांनी गावातील केरकचरा व घाण स्वच्छ करून दोन ट्रॉल्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. यानंतर नालंदा बुद्ध विहार व जि.प. पूर्व माध्यमिक शाळा परिसरातील केरकचरा व घाण स्वच्छ करण्यात आली.
यावेळी गाव स्वच्छ, सुंदर व आजारमुक्त रहावे यासाठी सर्वच ग्रामस्थांनी सदर अभियानात पुढाकार घेवून आपण जागृत नागरिक असल्याचे दर्शन घडवून दिले. यात प्रामुख्याने कृउबासचे संचालक रमेश टेंभरे, सरपंच जगन्नाथ पारधी, सुरेंद्र कोटांगले, भोजराज पटले, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, शिवचरण शहारे, मेखचंद शहारे, अंतुलाल पारधी, भावराम कोटांगले, इंदल बिसेन, गेंदलाल पारधी, उदेलाल पारधी, गोपीचंद रिनाईत, माजी सरपंच उमेंद्र पारधी, घनश्याम जांभूळकर, उपसरपंच सोनू पारधी, सुभाष जांभूळकर, खेमू रिनाईत आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)