अतिवृष्टी झाली तर या २१ भागांना धोका,पावसात या ठिकाणी न गेलेले बर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:46+5:302021-07-27T04:30:46+5:30

गोंदिया : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीमुळे पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील २१ गावांना फटका बसतो तर पाच ते सहा ...

If there is heavy rain, these 21 parts are in danger. | अतिवृष्टी झाली तर या २१ भागांना धोका,पावसात या ठिकाणी न गेलेले बर !

अतिवृष्टी झाली तर या २१ भागांना धोका,पावसात या ठिकाणी न गेलेले बर !

गोंदिया : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीमुळे पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील २१ गावांना फटका बसतो तर पाच ते सहा ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानंतर धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी न गेलेले बरे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. वैनगंगा आणि बाघ नदीला पूर आल्यास तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील २१ गावांना फटका बसतो. ब्राम्हणटोला, पुजारीटोला, वडेगाव, बिरसोला, कासा, किन्ही, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा, लोधीटोला, मरारटोला, किडंगीपार, अर्जुनी, सावरा, पिपरिया, चांदोरी खुर्द, चांदोरी बु., घाटकुरोडा, करटी या गावात अतिवृष्टी झाल्यानंतर धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

.................

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे

जोराचा पाऊस अथवा अतिवृष्टी झाल्यास कटंगी कला, पिंडेकपार, फुलचूर, कुडवा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हा भाग पांगोली नदी लगत असल्याने या नदीचे पाणी बरेचदा या भागात शिरते त्यामुळे या परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. हा भाग थोडा सखल असल्याने या भागात पाणी साचत असल्याची माहिती आहे.

.............

पालिकेचे तेच रडगाणे

दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात पाणी साचते. थोडा पाऊस झाला की शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. शहरातील गंजवाॅर्डातील भाजीबाजारात तर ही समस्या आता नेहमीच झाली आहे. मात्र यावर नगर परिषदेने अद्यापही तोडगा काढला नाही. ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या नाही. नगर परिषदेने नेहमीच वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत याकडे डोळेझाक करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे पालिकेचे तेच रडगाणे कायम असल्याचे चित्र आहे.

...........

पाणी साचण्याची कारणे

- वैनगंगा आणि बाघ नदीला पूर आल्यास ओव्हरफ्लो हाेऊन नदी काठालगत असलेल्या गावांमध्ये पाणी साचते.

- ही २१ गावे नदी पात्रापासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने या भागात पाणी साचते.

- गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील धरणातील पाणी सोडल्यास वैनगंगा आणि बाघ नदीचे पात्र फुगते त्यामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील २१ गावांना याचा फटका बसतो.

- हा भाग काही प्रमाणात सखल असल्याने सुध्दा या भागात लवकर पाणी साचते.

.............

ही आहेत सर्वाधिक धोकादायक स्थळे

जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्प, इटियाडोह, हाजराफॉल, रजेगाव घाट या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. विशेष पुलावरुन पाणी वाहत असताना प्रवास करणे, डोहाजवळ मस्ती करणे यामुळे या परिसरात दरवर्षी घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

...............

पाऊस नको नको सा.....

दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगा आणि बाघ नदीला आलेल्या पुरामुळे आमच्या गावाला फटका बसतो. मागील वर्षी सुध्दा पुराचा फटका बसल्याने आठ ते दहा दिवस दुसरीकडे जाऊन राहावे लागले होते. अतिवृष्टी झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.

- विकास गायकवाड,

........

आमचे गाव बाघ नदी काठालगत असल्याने अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावात पाणी साचते. बरेचदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास गावात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनातर्फे आम्हाला सुरक्षित स्थळी हलविले जाते.

- देवीदास उमक,

Web Title: If there is heavy rain, these 21 parts are in danger.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.