पीक कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:25+5:302021-07-29T04:29:25+5:30
नवेगावबांध : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त करण्यासाठी दोनदा कर्जमुक्ती योजना राबवली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ...

पीक कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित
नवेगावबांध : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त करण्यासाठी दोनदा कर्जमुक्ती योजना राबवली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि त्यानंतर महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना राबविली होती. या योजनांचा अनेक शेतकऱ्यांना लाभसुध्दा मिळालेला आहे. पण या योजनांपासून अजूनही काही शेतकरी वंचित आहेत.
२०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून काही शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही. शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये शेतकरी पात्र तर आहेत, पण ते शेतकरी कर्जमुक्त झालेच नाहीत. याचा परिणाम त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केल्यास तुमच्या नावाचे आदेश आलेच नाहीत असे सांगितले जाते. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. या योजनेतसुध्दा त्यांना लाभ मिळाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा परिपूर्ण लाभ मिळालेला आहे. नवेगावबांध येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २५ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित होते. त्यापैकी ३ शेतकऱ्यांच्या नावे महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या यादीत समाविष्ठ होते. त्या ३ शेतकऱ्यांना लाभ पण मिळाला, मात्र उर्वरित २२ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.