आशा पल्लवित; पण दिलासा मिळेल का?
By Admin | Updated: July 16, 2014 00:14 IST2014-07-16T00:14:39+5:302014-07-16T00:14:39+5:30
मृग नक्षत्राला सुरूवात होण्याच्या आठवडाभरापूर्वीपासून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण मृगात पाऊस बरसलाच नाही. पाहता पाहता पावसाळ्याचा सव्वा महिना कोरडा गेला. एक-दोन वेळा बरसलेल्या

आशा पल्लवित; पण दिलासा मिळेल का?
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : १ हजार ९०७ हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट
नरेश रहिले - गोंदिया
मृग नक्षत्राला सुरूवात होण्याच्या आठवडाभरापूर्वीपासून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण मृगात पाऊस बरसलाच नाही. पाहता पाहता पावसाळ्याचा सव्वा महिना कोरडा गेला. एक-दोन वेळा बरसलेल्या पावसाने कशीबशी रोपे उगवली, पण पावसाअभावी तीसुद्धा करपली. आता सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा रिमझिम का असेना, पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र हा पाऊस खरोखरच मृतप्राय रोपांना जीवदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल का? याबाबतची साशंकता अजूनही कायम आहे.
भाताच्या या जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ९०० हेक्टरमध्ये धान पिकाची लागवड केली जाते. या लागवडीसाठी (रोवणीसाठी) मृग नक्षत्र लागण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी नर्सरी (रोपे) टाकल्या होत्या. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे टाकलेले धान पक्ष्यांनी टिपले. मृग नक्षत्रात केवळ एक दिवस पाऊस आल्याने मातीखाली असलेले धान अंकुरले. परंतु पुन्हा उकाडा सुरू झाल्यामुळे आलेले अंकुर करपून गेले. आपली नर्सरी मरू नये यासाठी काही शेतकऱ्यांनी आटापिटा करून लांब असणाऱ्या विहीरीतील पाणी आपल्या नर्सरीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. काहींनी ट्रॅक्टरच्या टाकीने धान नर्सरीला पाणी दिले. परंतु ज्यांच्याकडे साधन नाही, पैसा नाही अशा शेतकऱ्यांच्या नर्सरी मरण पावल्या. परिणामी जिल्ह्यातील १ हजार ९०७ हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचे संकट उभे राहीले.
गोंदिया तालुक्यात ३४८२ हेक्टरवर धान पिक लावले जाते. यासाठी ३०२० हेक्टरवर नर्सरी लावण्यात आली. तिरोडा तालुक्यात ३००१ हेक्टरवर धान पिक लावले जाते. यासाठी २९७६ हेक्टरवर नर्सरी लावण्यात आली. आमगाव तालुक्यात २०२३ हेक्टरसाठी १९९६ हेक्टरवर, गोरेगाव तालुक्यात २०७५ हेक्टर धान पिकासाठी १९८० हेक्टरवर, सालेकसा तालुक्यात १६३० हेक्टर पिकासाठी १५८० हेक्टरवर तर देवरी तालुक्यात २०४२ हेक्टरवरील धान पिकासाठी १४९० हेक्टरवर नर्सरी लावण्यात आली.
तसेच अर्जुनी/मोरगाव तालुक्यात २२८७ हेक्टरसाठी २१५० हेक्टरवर आणि सडक/अर्जुनी तालुक्यात १९५० हेक्टर पिकासाठी १७५० हेक्टरवर नर्सरी लावण्यात आली. एकूण १८ हजार ४९० हेक्टर जमिनीवरील नर्सरीपैकी १ हजार ९०७ हेक्टर जमिनीवरील नर्सरी वाया जाऊन तिथे दुबार पेरणीचे संकट उभे झाले आहे.
दुबार पेरणीचा फटका १ हजार ९०७ हेक्टरला
पावसाअभावी नर्सरीतील धान उन्हामुळे आणि पक्ष्यांनी खल्ल्याने वाया गेले. मृगात एक वेळ आलेल्या पावसाने अंकुरलेले धान पावसाअभावी मरण पावले. त्यामुळे जिल्ह्यातील १९०७ हेक्टरमधील नर्सरी वाया गेली असून या क्षेत्रासाठी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील ६९६ हेक्टर, तिरोडा ६२ हेक्टर, आमगाव ८० हेक्टर, गोरेगाव २०३ हेक्टर, सालेकसा २५ हेक्टर, देवरी २१६ हेक्टर, अर्जुनी/मोरगाव ३५० हेक्टर तर सडक/अर्जुनी ३५० हेक्टर शेतीवर दुबार पेरणीचे संकट आहे.
केवळ आठ टक्के झाल्या रोवण्या
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सोय होती अशा शेतकऱ्यांनी मामा तलावातील किंवा विहीरीतील पाणी वापरून कशाबशा ८ टक्के रोवण्या केल्या आहेत. त्यात गोंदिया तालुक्यात ४४२ हेक्टर, तिरोडा २३१ हेक्टर, आमगाव १८० हेक्टर, गोरेगाव २६८ हेक्टर, सालेकसा ३४६ हेक्टर, देवरी ११५ हेक्टर, अर्जुनी/मोरगाव १८० हेक्टर, सडक/अर्जुनी १७५ हेक्टर अशा एकूण १९३७ हेक्टरमध्ये रोवण्या झालेल्या आहेत. वास्तविक पाऊस वेळेवर आला असता तर या वेळेपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रोवण्या आटोपणे अपेक्षित होते.
१२ हजार ६०६ हेक्टरमध्ये टाकल्या आवत्या
यंदा मृग नक्षत्र कोरडा गेल्यामुळे दुष्काळाचे सावट असल्याचे लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोवणी करण्यापेक्षा आवत्या टाकण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ हजार ६०६ हेक्टरमध्ये आवत्या टाकल्या आहेत. त्यात गोंदिया तालुक्यात २९५० हेक्टर, तिरोडा १४५, आमगाव २७१, गोरेगाव ९४९, सालेकसा ९६८, देवरी ५,४२३, अर्जुनी/मोरगाव १३५०, सडक/अर्जुनी ५५० अशा १२,६०६ हेक्टरमध्ये आवत्या पद्धतीने धान पेरण्यात आले.