कोरोनामुळे पालक हिरावलेल्या बालकांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:14+5:30
तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली.

कोरोनामुळे पालक हिरावलेल्या बालकांना मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या व एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील या बालकांच्या कुटुंबांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली, तसेच या बालकांच्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची ग्वाही देत या बालकांचे सांत्वन केले. प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी घरापर्यंत येऊन सांत्वन केल्याने या बालकांचे नातेवाईकसुद्धा भारावून गेले होते.
तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली. कुटुंबातील मुलांना फळ व बिस्कीट व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यांची आस्थेने विचारपूस करून शासनाच्या योजनांचा लाभ बालक व त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाहीसुद्धा जिल्हाधिकारी खवले यांनी दिली. हा दु:खाचा काळ आहे, शासन आपणास सर्वतोपरी मदत करणार, विधवा पेन्शन योजना व इतर सोयी- सवलतींकरिता शासनाकडून मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवरीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, आमगावचे तहसीलदार डी.एस. भोयर उपस्थित होते.
१५० बालकांचे वडिलांचे छत्र हरपले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कहर केले. साडेपाचशेवर नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंंबांतील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. १५० बालकांचे वडिलांचे छत्र, तर ४७ बालकांचे आई- वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा बालकांचा शोध घेऊन आता शासनाकडून मदत केली जात आहे.
कोरोनामुळे आई- वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांसाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांना दिला जातो. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून प्रशासन तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याची जाणीव करून अशा कुटुंबांना भेट देण्याचा उपक्रम प्रशासनाने सुरू केला आहे.
-राजेश खवले, जिल्हाधिकारी