जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:05 IST2019-06-27T22:04:32+5:302019-06-27T22:05:00+5:30

नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.

Grampanchayat's management from a dilapidated building | जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार

जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नाही

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.
आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आदिवासींच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाºया योजना किंवा त्यांना दिला जाणारा लाभ हा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच दुर्बल घटकात असल्याचे वास्तव चित्रण गोंदिया जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
आमगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. अर्जुनी-मोरगाव १, गोरेगाव १३, सालेकसा ४, तिरोडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींना स्वत:ची जागा नाही. या ३० ही ग्रामपंचायतींकडे जागा आहे परंतु इमारत नाही अशी अवस्था आहे. जिल्ह्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या इमारती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या इमारती बांधण्याची नितांत गरज आहे. आमगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या जीर्ण झाल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १९, देवरी १९,गोंदिया १६, गोरेगाव ६, सडक-अर्जुनी १५, सालेकसा १ व तिरोडा १० ग्रामपंचायतच्या इमारती जीर्ण आहेत.
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मग्रारोहयो, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, १४ वित्त आयोगाची कामे, विशेष देखभाल दुरूस्ती व शासनाच्या कुठल्याही योजनांचा फायदा घ्याचा असेल तर ग्रामपंचायतशिवाय पर्याय नाही. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वत:चे छत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीतून योजनांचा पाठपुरावा करावा लागत आहे.
आपले सरकारला जागा नाही
शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू केले. या सेवा केंद्रासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत एक स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींपैकी ३७८ ग्रामपंचायतमध्ये या सेवा केंद्रासाठी स्वतंत्र खोली नाही. त्यात आमगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतमध्ये,अर्जुनी-मोरगाव ६९, देवरी २७, गोंदिया १०६, गोरेगाव ५५, सडक-अर्जुनी ६२, सालेकसा ११, तिरोडा १७ ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र खोली देण्यात आली नाही. अशी दुरवस्था ग्रामपंचायतींची गोंदिया जिल्ह्यात आहे.

Web Title: Grampanchayat's management from a dilapidated building