ग्रा.पं. निवडणूक ही पक्षविरहित असल्याने महाविकास आघाडी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:34+5:302021-01-13T05:16:34+5:30
गोंदिया : ग्रामपंचायतच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर गावकरी लढवीत असतात. ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात आहे. ...

ग्रा.पं. निवडणूक ही पक्षविरहित असल्याने महाविकास आघाडी नाही
गोंदिया : ग्रामपंचायतच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर गावकरी लढवीत असतात. ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात आहे. केवळ पक्षाकडून उमेदवारांना बाहेरून सहकार्य केले जाते. ही स्थानिक पातळीवरची बाब असल्याने यात महाविकास आघाडी करून निवडणूक लढण्याचा प्रश्न येत नसल्याचा सूर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आवळला.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होऊ घातली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढविली. त्यामुळे यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवारसुद्धा निवडून आले. यामुळे या तिन्ही पक्षात नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यानंतर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हेच सूत्र का लागू करण्यात आले नाही, जे विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत जमले ते ग्रामपंचायत निवडणुकीत का जमले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ग्रामपंचायतच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढविल्या जातात. ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. एकंदरीत ती पक्षविरहित असते. तर बहुतेक गावात एकाच पक्षाचे पदाधिकारी सदस्य हे सुद्धा वेगवेगळे पॅनल करून लढतात. यामुळे कुठलाही राजकीय पक्ष या निवडणुकीत हस्तक्षेप करीत नसतो. केवळ आपल्या पक्षाशी निगडित असलेल्या उमेदवारांना सहकार्य करीत असतात. त्यामुळे या निवडणुका युती किंवा महाविकास आघाडी करून लढल्या जात नसल्याचा सूर पुढे आला.
निकालानंतर बदलेल चित्र
ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहित असते. असे असले तरी सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतवर आपले पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्न केले जातात. यंदा सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रा.पं.वर सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक पातळीवर सोडला जातो निर्णय
ग्रामपंचायत निवडणूक ही गाव पातळीवर लढविली जाते. त्यामुळे बहुतेक सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर साेपवीत असतात.
निवडणूक पार पडल्यानंतर सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यानंतर त्या गावावर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र बहुधा ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचा हस्तक्षेप कमीच असतो.
..
ग्रामपंचायत निवडणूक ही प्रामुख्याने स्थानिक पातळीवर लढविली जाते. यात बरेचदा गावकरी आपसात समन्वय साधून बिनविरोधसुद्धा निवडणूक पार पाडीत असतात. त्यामुळे यात कुठलाही राजकीय पक्ष हा हस्तक्षेप करीत नसतो. ही निवडणूक पक्षविरहित असते.
- पंचम बिसेन
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
ग्रामपंचायतच्या निवडणुका या स्थानिकस्तरावर लढविल्या जातात. त्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. शिवाय प्रत्यक्षपणे यात कुठल्याही पक्षाचा सहभाग नसतो. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
- डाॅ. नामदेव किरसान
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस