बंदूक सोडली पुस्तक वाचली, झाली मॅट्रिक पास ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:58+5:302021-07-28T04:29:58+5:30
देवरी : वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले की जीवनाचा निश्चित कायापालट होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. ...

बंदूक सोडली पुस्तक वाचली, झाली मॅट्रिक पास ()
देवरी : वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले की जीवनाचा निश्चित कायापालट होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. असेच बंदूक असलेल्या हातात लेखणी आल्याने मुलीच्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचे वास्तव चित्र पुढे आले आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी नक्षल चळवळ सोडण्यापूर्वी रजूला हिडामीवर (१६) अर्धा डझनहून अधिक गुन्हे होते. तिने पोलिसांवर गोळीबार करण्यात भाग घेतला होता. पोलिसांना आत्मसमर्पण करुन नवीन जीवनाला सुरुवात केली. आता ती दहावी उत्तीर्ण झाली असून ५१.८० टक्के गुण प्राप्त केले असून तिने महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होण्याचा मानस व्यक्त केला आहे. मूळची गडचिरोली येथील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील लाहेरी खेड्यातील रजूला हिडामी हिला शस्त्र व शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण येत होते. एकदा त्यांनी गडचिरोलीच्या कोरची-खोब्रेमेंढा-कुरखेडा दलमध्ये काम केले. सन २०१८ मध्ये गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण नंतर पोलिसांनी तिला पुन्हा शिक्षण देण्यास मदत केल्याने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलण्यास मदत झाली. तत्कालीन पोलीस अधीक्षक हरिश बैजल, अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मदतीने व नक्षल सेलच्या पोलिसांनी रजूला हिडामी हिला देवरी येथील आदिवासी मुलींच्या शाळा व वसतिगृहात दाखल केले. सन २०१९ ते २०२१ मध्ये गोंदियात आठवी ते दहावीच्या परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणिताची अडचण आली. तिला मदत करण्यासाठी नक्षल सेलमधील देवरी येथील कर्माचाऱ्यांनी तिला मार्गदर्शन करुन तिची अडचण दूर केली. अपर पोलीस अधीक्षक आटोळे यांनी तिला शाळेचे एक किट,स्कूल बॅग, पुस्तके, सायकल आणि गणवेश देखील खरेदी करून दिले. नक्षल सेलने रजूला हिडामीला सर्वतोपरी मदत केली.
..............................
रजूलाच्या जीवनाला मिळाली कलाटणी
रजूलाला नक्षलवाद्यांनी पळवून नेले. नक्षलवाद्यांनी तिचा सेल फोन हिसकावून घेतला आणि दिशानिर्देश विचारण्याच्या बहाण्याने तिला बरोबर घेऊन गेले. यानंतर नक्षलवाद्यांनी तिला शस्त्र व्यतिरिक्त वॉकी-टॉकी आणि इतर गॅझेट्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर, ती दलमध्ये लोकप्रिय ठरली आणि गटाच्या नित्यक्रमाचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी ‘टॅब’ वापरायला लागली. मात्र पोलिसांना आत्मसमर्पण केल्यानंतर रजूलाचे जीवन पूर्णपणे बदलले. पोलिसांनीच तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला. यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.