फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान
By Admin | Updated: September 24, 2015 02:15 IST2015-09-24T02:15:38+5:302015-09-24T02:15:38+5:30
गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे.

फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान
१०० वर रुग्णांवर उपचार : फुलचूरमध्ये लावले विशेष शिबिर
गोंदिया/नवेगावबांध : गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. फुलचूर येथील १०० पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून नवेगावबांध येथील १२ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गोंदिया शहरालगत फुलचूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काही लोकांना मंगळवारी उलटी आणि हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गौरव देवेंद्र शहारे (१३), मोहन दौलत नागपुरे (६०), संगीता अमरकंठ नागपुरे (३२), बळीराम नागपुरे (३०), प्रमिला डोंगरे (३४) तथा आणखी एका रुग्णालाय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वास्तविक फुलचूरच्या वॉर्ड नं. ३ मध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर खमारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक शिबिर लावण्यात आले. या शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे जुन्या पाईपलाईनमुळे नळाची पाईपलाईन लिकेज झाली. हे पाणी एका खड्ड्यात जमा झाले. त्यातील दूषित पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पोहोचले. खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कातोरे यांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले. नवेगावबांध येथे पिण्याच्या पाण्याचा दुषीत पुरवठा झाल्यामुळे गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. पावसाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आरोग्य सेविका परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवितात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदवहीत सूचना करतात. नवेगावबांध येथील आरोग्य सेविकेने दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवून ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी नोंदवहीत सूचना दिली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सूचनेची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसू लागले. नवेगावबांध येथे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावेळी ग्राम विकास अधिकारी टी.एम. समरित यांना पाण्याची नियमित तपासणी केली जाते असे सांगितले होते. मग आता गॅस्ट्रोची लागण कशी झाली असे प्रश्न निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे. आतातरी ग्रामपंचायतने पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)