शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना दोन वर्षाचा सश्रम कारवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST2021-09-22T04:32:50+5:302021-09-22T04:32:50+5:30
गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिकेवर गोंदियात सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र ...

शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना दोन वर्षाचा सश्रम कारवास
गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिकेवर गोंदियात सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. आरोपी अभिमन्यू प्राणहंस मडामे (२३), डायमंड ऊर्फ विश्वनाथ डोंगरे (३९, दोन्ही रा. कटंगीटोला), राजेश ऊर्फ मोगली रमेश बन्सोड (१९, रा. इंदिरानगर-कॉलेज टोली, कुडवा) व नरू ऊर्फ परमेश्वर रामलाल बिसेन (२४, रा. तेढवा) असे आरोपींचे नाव आहे. ही सुनावणी मंगळवारी (दि.२१) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर अहेमद औटी यांनी केली आहे.
रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिका २३ सप्टेंबर २०१२ रोजी रेल्वेच्या जनरल डब्यात बसून भोपाळवरून रायपूर येथे जात असताना त्यांची पैसे असलेली बॅग आरोपींनी पळविली होती. गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी येताच बॅगमधील २१ हजार ९०० रूपये चोरून नेणाऱ्या आरोपींनी ती बॅग डोंगरगड रेल्वेस्थानकावर टाकली. पीडित महिला डोंगरगड येथे गेल्यावर फलाटावर त्यांची बॅग दिसल्याने त्यांनी आपली बॅग ओळखून त्या बॅगजवळ गेल्या असता आरोपींनी त्यांना चोरीला गेलेले पैसे मिळवून देतो परंतु त्यासाठी गोंदियाला जावे लागेल असे सांगितले. पैसे मिळविण्यासाठी शिक्षिका आरोपींसोबत त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गोंदिया रेल्वे स्थानकावर आल्या. आरोपींनी त्यांना ऑटो क्रमांक ४८९ मध्ये बसवून अंगुर बगिचा मैदानात नेले. तेथे तिचे तोंड दाबत असताना त्यांनी त्यांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पकडून चाकूचा धाक दाखवून चौघांनी आळीपाळीने अत्याचार केला.
पुन्हा रात्रीला त्यांच्यावर अत्याचार करून अंगुरबगिचा येथे असलेल्या एका घरात ठेवले. दुसऱ्या दिवशी नजर चुकवून शिक्षिका पळत गोंदिया रेल्वे स्थानकावर आली. या घटनेची तक्रार आधी गोंदिया रेल्वे पोलिसांत करण्यात आली. मात्र हा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने रामनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६६, ३७६ (जी) ३७९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सर्व आरोपींना प्रत्येकी दोन वर्षांचा सश्रम कारावास व ६० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केला होता. सरकारी वकील म्हणून ॲड. पी.एस. आगाशे व ॲड. कैलास खंडेलवाल यांनी काम बघितले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस शिपाई नमिता लांजेवार यांनी काम बघितले.