दमदार पावसाची शेतकऱ्यांना आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:55+5:302021-07-27T04:30:55+5:30

अर्जुनी मोरगाव : पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात महापूर असतांना पूर्व विदर्भ मात्र कोरडाच आहे. गोंदिया जिल्ह्यात केवळ ४३ ...

Farmers hope for heavy rains | दमदार पावसाची शेतकऱ्यांना आस

दमदार पावसाची शेतकऱ्यांना आस

अर्जुनी मोरगाव : पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात महापूर असतांना पूर्व विदर्भ मात्र कोरडाच आहे. गोंदिया जिल्ह्यात केवळ ४३ टक्केच रोवणी झाली आहेत. शेतकऱ्यांना रोवणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरण, तलाव अद्यापही भरली नाहीत. रोवणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात धानपीक घेतले जाते. धानाला मुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र दमदार पाऊसच पडत नाही. आकाशात मेघ दाटून येतात तसेच निघून जातात. ढगांकडे बघतच शेतकऱ्यांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहऱ्याने शेतीतून पाय काढतो. पावसाच्या प्रतीक्षेत डोक्याचा ताण वाढत जाऊन दुसरा दिवस उजाडतो तो लख्ख प्रकाशानेच. नुसता उन्ह-ढग दाटून येण्याचा खेळ सुरू असतो. आता दमदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे. जुलै महिना हा पावसाचा असतो. धानपिकाचे भविष्य पावसावरच अवलंबून असते. भरपावसाळ्यात नुसती रिपरिप असते. जून व जुलै या दोन्ही महिन्यात अपेक्षित पावसाने सरासरी गाठली नाही. अनेक तालुक्यात तर अद्याप एका दिवसात अतिवृष्टी होण्याचे खाते उघडले नाही. १ ते २२ जुलै दरम्यान जिल्ह्यात साधारणतः ४१४.९ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी केवळ १९१.९ मि.मी. पावसाची नोंद यादरम्यान झाली आहे. या काळात पावसाची टक्केवारी ४६.३ टक्के आहे. आमगाव ३३.९ व सडक अर्जुनी तालुक्यात ३७.२ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. उत्पादन चांगले येते म्हणून आजकाल हायब्रिड धानलागवडीची फॅशन झाली आहे. हायब्रीड धान नर्सरी पेरणी केल्यापासून २५ दिवसात रोवणी केली तर पीक चांगले येते. ७५ टक्के हायब्रीड धानाची लागवड आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात नर्सरी लागवड केली. दीड महिना लोटला.अद्याप रोवणी झाली नाहीत. याचा निश्चितपणे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यात १ लक्ष ७७ हजार ७२६ हेक्टर शेतजमिनीत धान पीक लागवड करण्यात आली. यापैकी केवळ ७६ हजार ८७२ हेक्टरमध्ये रोवणी झाली आहेत. रोवणीची टक्केवारी ४३ आहे. तालुकानिहाय रोवणीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

...................

खरीप हंगाम धान पेरणी अहवाल

तालुका क्षेत्र रोवणी टक्केवा

गोंदिया ४३७२३ १७४०८

गोरेगाव १७२४३ ४३९०

तिरोडा १८२३७ ७६५५

सअर्जुनी १७९८५ ७४५५

अर्जुनी मो २२४९० १३४१३

आमगाव १८६४५ ९३२५

सालेकसा १६७३१ ५८९८

देवरी २२६७२ ११३२६

--------------------------------------------

एकूण १७७७२६ ७६८७२ ४३ टक्के

--------------------------------------------

नियमित वीजपुरवठा करा

जिल्ह्यात धरण व मोठे तलाव आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदले. काही भागात धरणाच्या पाण्याने सिंचन होते. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी झाली. मात्र कोरडवाहू क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. केवळ आठ तास वीज पुरवठ्यामुळेही रोवणीत व्यत्यय येत आहेत. शेतात चिखल करण्यासाठी पुरेपूर पाणी एवढ्या वेळात होतच नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण विभागाने सतत वीजपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

.............

तर उत्पादनावर परिणाम

यावर्षी अनियमित पाऊस पडत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे रोवणी लांबली आहेत. ज्यांना बोअरवेल व नहराची सुविधा आहे. केवळ त्यांचीच रोवणी झाली आहेत. अद्याप ५७ टक्के शेतकऱ्यांची रोवणी झाली नाहीत. हायब्रीड धानलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट येण्याची भीती आहे. शेतीला विजेचाही फटका पडतो आहे. वीज महामंडळाने हंगाम काळात नियमित वीजपुरवठा केल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो.

गंगाधर परशुरामकर, प्रगतिशील शेतकरी खोडशिवणी

Web Title: Farmers hope for heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.