अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरले
By Admin | Updated: September 17, 2015 02:20 IST2015-09-17T02:20:25+5:302015-09-17T02:20:25+5:30
मोरगाव : मुंगलीटोला येथील आंगणवाडी सेविका रोशनी कोल्हे यांचे अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर सेवासमाप्तीचे संकट उद्भवले आहे.

अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरले
चौकशीत उघड : नियुक्ती वादग्रस्त ठरली
अर्जुनी-मोरगाव : मुंगलीटोला येथील आंगणवाडी सेविका रोशनी कोल्हे यांचे अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर सेवासमाप्तीचे संकट उद्भवले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या चौकशीत हे उघड झाले आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई होत नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचा आरोप कल्पना जांभूळकर यांनी केला आहे.
तालुक्यातील मुंगलीटोला या गावासाठी २००६ मध्ये मानधन तत्वावर अंगणवाडी सेविका पदासाठी भरती करण्यात आली. यासाठी ९ महिला उमेदवारांनी अर्ज केले. दस्तावेज व मुलाखतीच्या आधारावर तब्बल ८ वर्षानंतर निवड करण्यात आली.
५ सप्टेंबर २०१४ ला नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सुधारित मुल्यांकन करण्यात आले. यात रोशनी कोल्हे यांना ६४ तर कल्पना जांभूळकर यांना ५६-२५ गुण मिळाले. सर्वाधिक गुण असल्यामुळे रोशनी कोल्हे यांची ३० सप्टेंबर २०१४ रोजी निवड करण्यात आली.
रोशनी कोल्हे यांचे माहेरचे नाव माया दादु चाचेरे असे आहे. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी रोजी अनुभव प्रमाणपत्र तपासणीचे निर्देश सहायक प्रशासन अधिकारी डी.एस. लोहबरे यांना दिले. त्यांनी किरसान मिशन्स स्कूल गोरेगाव येथे जाऊन चौकशी केली. माया चाचेरे यांनी सन २००२ ते २००४ पर्यंत पूर्व प्राथमिक विभागात कार्य केल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडले होते. चौकशीत हे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे.
अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अनुभवाचे दिलेले १५ गुण कमी झाल्यास त्यांचे गुणांकन ४९ होते तर कल्पना जांभूळकर यांचे गुणांकन ५६.२५ आहे. त्यामुळे कोल्हे यांची नियुक्ती रद्द करण्याची कार्यवाही जि.प.च्या बाल कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आली.
यावर कोल्हे यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे पत्र दिले. त्यांनी १० मार्च रोजी स्पष्टीकरण सादर केले. यात अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्याबद्दल उजर तक्रार नसल्याचे म्हटले आहे.
मात्र सर्वाधिक गुण असल्यामुळे नियुक्ती कायम ठेवण्यात यावी असे नमूद केले. मार्च महिन्यापासून बाल कल्याण विभागाची ही कार्यवाही सुरू असून सहा महिन्यातही ते अद्याप निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाही. त्यामुळे येथे पाणी मुरत असल्याचा आरोप कल्पना जांभूळकर यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)