लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवीन शैक्षणिक सत्र २०२५-२६ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सरपंचांना एक महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. गावातील ३ ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करा. शिक्षण विभागाने याबाबत आदेश काढत सरपंचांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, येत्या २३ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. गावात शिक्षणासंदर्भातील अनियमितता, शाळाबाह्य मुलांचे प्रमाण, बालमजूरी, बालविवाह आणि बालकांचे लैंगिक शोषण या गंभीर विषयांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'ग्राम बाल संरक्षण समित्या' सक्रिय कराबालकांचे शैक्षणिक आणि नैतिक विकास सुनिश्चित करण्यासाठी 'ग्राम बाल संरक्षण समित्या' तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समित्यांमार्फत गावात बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी निर्मूलन आणि लैंगिक शोषणाविरोधातील जनजागृती यावर काम केले जाणार आहे.
सरपंचांच्या पुढाकाराची गरजगावाच्या विकासात सरपंचांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. गावातील गैरहजर, गरीब आणि वंचित गटातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणे, त्यांच्या पुनःशिक्षणासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांशी समन्वय साधणे आणि जनजागृती करणे, ही त्यांच्या पुढील कामगिरीतील महत्त्वाची पावले ठरणार आहेत.
"शासन, शाळा आणि ग्राम प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून गावातील प्रत्येक मुलासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, बौद्धिक वाढ आणि नैतिक मूल्यांची जोपासना हे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मूल शाळेत जाईल."- सुधीर महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.