विद्यार्थिनींचा एसटी बससाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:48+5:302021-07-30T04:30:48+5:30
लोहारा : केंद्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना ...
लोहारा : केंद्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना देवरी आगाराच्या वतीने पासेस देण्यात येते. मात्र वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंत शाळा १५ जुलैपासून सुरु होऊनही मानव विकासच्या बसेस सुरू झालेल्या नाहीत. शाळेच्या वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थिनींना शाळेत वेळेत पोहचता येत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शाळा सुरू होऊन दोन आठवडे झालेत. परंतु मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना देवरी आगारातर्फे मोफत बस पासेस दिला गेला नाहीत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील चिचगड, ककोडी, पालांदूर, बोरगाव, सिदींबीरी, गनुटोला, परसोडी, कडीकसा, लोहारा, वडेगाव, मुल्ला या मार्गावर विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात आली नाही. शिवाय, इयत्ता ५ ते ७ आणि ८ ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत बस पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देवरी आगाराच्या वतीने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी आगाराच्या इतर प्रवाशी बसेसमध्ये भाडे द्यावे लागत असल्याने व शाळेच्या वेळेनुसार बसेस सुरू नसल्याने विद्यार्थिनींना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घेऊन देवरी आगार व्यवस्थापकाने शाळेच्या वेळेनुसार बसफेरी सुरू करावी, अशी मागणी देवरी येथील मनोहरभाई पटेल व इतर विद्यालयातील हजारो विद्यार्थिनींनी केली आहे.
------------------------
आंदोलनाचा दिला इशारा
बस अभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याने येत्या ७ दिवसांत ककोडी-चिचगड- पालांदुर-देवरी-लोहारा- वडेगांव-मुल्ला मार्गावर मानव विकास मिशनच्या माध्यमातून आगाराने स्वतंत्र बसफेरी सुरू न केल्यास महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देवरी विद्यार्थिनींनी दिला आहे.
-------------------------
१५ जुलै २०२१ पासून वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. पंरतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शाळेच्या वेळेवर येण्या-जाण्याचे साधन उपलब्ध करुन देण्यात आलेले नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या विषयाला गांभीर्याने घेत शासन-प्रशासनाने मानविकास योजने अंतर्गत मोफत बस व पासची सेवा देवरी आगारात सुरू करावी.
-के.सी.सहारे, मुख्याध्यापक, मनोहरभाई पटेल शाळा