अकरावीच्या २,२७० जागा रिक्त ?
By Admin | Updated: June 14, 2015 01:51 IST2015-06-14T01:51:55+5:302015-06-14T01:51:55+5:30
जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांची खिरापत वाटताना अकरावी प्रवेशासाठी असलेली प्रवेश क्षमता जास्त आणि विद्यार्थी कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अकरावीच्या २,२७० जागा रिक्त ?
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांची खिरापत वाटताना अकरावी प्रवेशासाठी असलेली प्रवेश क्षमता जास्त आणि विद्यार्थी कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या २२७० जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी २०६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात विद्यार्थी क्षमता २३ हजार ३९० आहे. मात्र यंदा केवळ २१ हजार १२० विद्यार्थी दहाव्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील अनेक विद्यार्थी आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतील. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेणारे जेमतेम २० हजार विद्यार्थी असणार आहेत.
शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने अनेक नवनवीन विद्यालये उघडण्यात येत आहेत. शिवाय बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे कामही केले जाते. अकरावीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ शाळा, वरिष्ठ महाविद्यालय संलग्न पाच शाळा, माध्यमिक शाळा संलग्न ११९, स्वतंत्र ३२, नगर परिषदेची एक, आश्रमशाळा १३, सैनिकी शाळा एक व स्वयंअर्थसहाय्याच्या २१ शाळांचा समावेश आहे. स्वतंत्र व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न शाळांतील ११ व्या वर्गात प्रत्येकी १००-१०० विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. तर इतर शाळांमध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असते.
जिल्ह्यात अकरावी कला शाखेच्या २०१ तुकड्या, विज्ञान शाखेच्या १३३ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६ तर कला व वाणिज्य मिळून संयुक्त शाखेच्या सात अशा एकूण ३५७ तुकड्या आहेत. कला शाखेची १२ हजार ८२० एवढी प्रवेश क्षमता, विज्ञान शाखेची नऊ हजार १००, वाणिज्य शाखेची एक हजार १६० व संयुक्त शाखेची ३१० अशी एकूण २३ हजार ३९० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. त्यातही दहावा वर्ग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल व त्यांचा प्रवेश झाला नसेल तर मुख्याध्यापक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने २० विद्यार्थी वाढवू शकतात. त्यामुळे ३५७ तुकड्यांनुसार एकूण सात हजार १४० विद्यार्थी संख्या वाढविली जावू शकते. त्यामुळे ११ वीची प्रवेश क्षमता ३० हजार ५३० विद्यार्थी संख्येवर जावून पोहचते. मात्र विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी दहावा वर्ग उत्तीर्ण झाल्याने तुकडीनिहाय २० विद्यार्थी वाढविण्याची गरज यंदा पडणार नाही. उलट काही शाळांना यंदा अकराव्या वर्गासाठी विद्यार्थी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
विज्ञान शाखेत प्रवेशासाठी चढाओढ
जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या १३३ तुकड्या आहेत. यात नऊ हजार १०० विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. बहुतांश आई-वडिलांची इच्छा आपल्या पाल्याने विज्ञानाचे शिक्षण घेवून डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनावे अशी असते. शिवाय आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढल्याने विद्यार्थ्यांचीसुद्धा याच शाखेत करियर करण्याची तयारी असते. त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही मोठाच प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने विज्ञान शाखेत विद्यार्थी संख्या वाढविण्याची पाळी मुख्याध्यापकांवर येते. दुसरीकडे कला शाखेत विद्यार्थ्यांचे प्रवेश अत्यल्प होत असल्यामुळे अनेक शाळांवर कला शाखा बंद करण्याचीसुद्धा पाळी ओढवते.
स्वयंअर्थसहाय्य शाळांचा प्रश्न
जिल्ह्यात अकरावीचे वर्ग असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या २१ आहे. या शाळांना शासनाकडून कसलेही अनुदान मिळत नाही. तसेच तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसुद्धा मिळत नाही. सन २०१३-१४ मध्ये या शाळांची संख्या १७ होती. मात्र त्यावर्षी दोन शाळांना मान्यता न मिळाल्याने त्या बंद पडल्या व १५ शाळा सुरू होत्या. यानंतर सन २०१४-१५ मध्ये आणखी सहा शाळांना मंजुरी मिळाल्याने त्यांची संख्या २१ झाली आहे. आता सन २०१५-१६ मध्ये आणखी काही शाळांना मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या संख्येत वाढ होवू शकते. शासनाकडून या शाळांना काहीही मिळत नसल्याने विद्यार्थी तेथे शिक्षण घेण्यास इच्छुक नसतात.