दुष्काळसदृश परिस्थिती कायम
By Admin | Updated: September 17, 2015 02:14 IST2015-09-17T02:14:15+5:302015-09-17T02:14:15+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती कायम
शेतकरी चिंताग्रस्त : पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
या परिसरात शेंडा, मसरामटोला, आबकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पाटीलटोला, कन्हारपायली, सालईटोला, पांढरवानी, कोयलारी, प्रधानटोला, कोहळीपार असे अनेक खेडेगाव आहेत. हा परिसर धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवस्थाय असून शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे धानपीक वाळून रोगाने ग्रासले आहे.
पावसाअभावी तलाव, बोड्यात पाणी साचले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी १४ ते २० फूट खोलात गेली. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या हलक्या प्रतिचे धान निसण्याच्या मार्गावर असताना पावसाने दगा दिला. बांध्याना भेगा पडल्या. बळीराजावर दुष्काळाची गडद छाया पडत आहे. धानाची शेती करुन आपला प्रपंच चालवणारा शेतकरी कर्जापायी आधीच हवालदिल झाला आहे. कधी बँकेकडून तर कधी स्थानिक संस्थाकडून कर्ज घेऊन शेती पिकासाठी झोकून देतो. आपला देश कृषिप्रधान आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, असे संबोधले जाते. सव्वाशे कोटी जनतेचा पोशिंदा हलाखीचे जीवन जगत आहे. तरीही त्याच्या मदतीला शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नाही.
या परिसरात काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून शेतात विहिरीवर मोटार पंप आहेत. परंतु मोटारींना पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे विहिरीतील पाणी बाहेर पडत नाही. वारंवार तक्रार करुनही या समस्येला विद्युत विभाग गांभीर्याने घेत नाही. या देशात ब्रिटिशकाळपासून आणेवारीची पद्धत अमलात आहे. ती एकदम चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. ज्या शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीत २५ टक्के उत्पन्न येत नाही, अशा शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न दाखवून अन्याय केला जातो. या चुकीच्या आणेवारी पद्धतीने अनेक शेतकरी वंचित राहतात. त्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.
सध्या या परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी शासनाचे पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेंडा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)