जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृष स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:46+5:30
देशात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. अशातच निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपल्याचे सद्यातरी दिसून येत आहे. सुरुवातीला शेतीची मशागत करण्यासाठी पाऊस आला. शेतकऱ्यांनी मशागत करून धान रोपांची लागवड केली.ज्या शेतकऱ्याची जमीन ओलिताखाली आहे. सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी रोवणी केली. ज्यांना ओलिताची सुविधा नाही ते रोपं लावून ढगांकडे बघत आहेत. त्यांची रोप करपत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : ढग दाटून येतात. आता किती पाऊस येणार असं वाटायला लागतं. मात्र काही वेळ दिसणारे काळे मेघ तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकऱ्यांचा दिवस जातो. मावळतीला हताश होऊन जड अंत:करणाने शेतातून पाय काढतो. जमिनीला भेगा बघून डोक्याचा ताण वाढवणारा परत नवा दिवस उजाडतो तोही लख्ख प्रकाशानेच. रोपं लावली ती वाळत आहेत.
रोवणी झाली पण जमिनीच्या मुळाला पाणीच नसल्याने ती पार करपत आहेत. असे भयाण वास्तव यावर्षी शेतकºयांच्या नशिबी आले आहे. एकूणच अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याचे दिसून येते.
देशात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. अशातच निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपल्याचे सद्यातरी दिसून येत आहे. सुरुवातीला शेतीची मशागत करण्यासाठी पाऊस आला. शेतकऱ्यांनी मशागत करून धान रोपांची लागवड केली.ज्या शेतकऱ्याची जमीन ओलिताखाली आहे.
सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी रोवणी केली. ज्यांना ओलिताची सुविधा नाही ते रोपं लावून ढगांकडे बघत आहेत. त्यांची रोप करपत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली त्यांच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. एवढे विदारक चित्र सद्या दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटासोबतच हे एक संकट शेतकऱ्यांवर आहे. रोवणी होत नसल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. भर पावसाळ्यात इटियाडोह धरणाचे पाणी कालव्यातून सिंचनासाठी उपलब्ध करुन द्यावे लागत आहे.
मात्र सिंचनाखाली नसलेल्या व कोरडवाहू जमीनधारक शेतकऱ्यांवर तर आभाळच कोसळले आहे. सद्या परिस्थिती लक्षात घेता यंदा इटियाडोह धरणातील पाणी साठवण क्षमतेचेही काही खरे दिसत नाही. येत्या आठवडाभरात पाऊस बरसला नाही तर निश्चितपणे दुष्काळाला सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही.
धानाची रोवणी साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत केली जातात. मात्र यंदा अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकºयांची चितां वाढली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्जन्यवृष्टी अत्यंत कमी
तालुक्यात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहिल्यास सर्वात कमी पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली आहे. नवेगावबांध ४१७. २० मिमी (५८ टक्के), बोडगावदेवी ३९७.२५ (५५ टक्के), अर्जुनी मोरगाव ३५४.१५ (४९ टक्के), महागाव २०९.६० (२८ टक्के), व केशोरी २८९.६० (४० टक्के) याप्रकारे तालुक्याची सरासरी ४६ टक्के आहे. सडक अर्जुनी तालुक्याची स्थिती सुद्धा फारशी चांगली नाही. सौंदड ४३९.७२ (६३ टक्के), डव्वा ३३२ (४८ टक्के) तर सडक अर्जुनी ४७८.२६ (६८ टक्के) याप्रकारे तालुक्याची सरासरी ६० टक्के आहे.
कोरडवाहू जमीन राहणार पाण्याअभावी पडीक
जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली तरी पावसाने सरासरी गाठलेली नाही. आतापर्यंत केवळ ४५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे १ लाख १० हजार हेक्टवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. रोवणी वाळत चालली असून पऱ्ह्यांची सुध्दा मदत संपत चालली आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मोठ्या कोरडवाहू क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
पाणीटंचाई
कोरोनाचे संकट असतांनाच शेतकऱ्यांसमोर दुष्काळी परिस्थितीची चिन्हे दिसून येत आहेत. पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडत आहेत.कडक उन्ह तापत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दुष्काळ तर पडेलच परंतु पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होईल.