जिल्ह्यात ८५ टक्के रोवणी आटोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:14+5:30
जून महिन्यात पावसाला सुरूवात होऊन शेतीची कामेही मोठ्या झपाट्याने सुरू होतात. मात्र जून महिना कोरडाच गेला व त्यामुळे शेतीची कामेही पूर्णपणे ठप्प पडून होती. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामात हात टाकला. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी बघतच बसले.

जिल्ह्यात ८५ टक्के रोवणी आटोपली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा पावसाच्या खेळीमुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांवर चांगलाच परिणाम दिसून आला. मात्र उशिरा का होईना जिल्ह्यात आता ८५ टक्के रोवणी आटोपली आहे. त्यातही सध्या पावसाची दररोजच हजेरी लागत असल्याने काही दिवसांतच उरलेली १५ टक्के रोवणी आटोपणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता अन्य पिक ांकडे वळत असल्याचे दिसून येत असतानाही सर्वात जास्त प्रमाणात धान शेतीच केली जाते. धानाला जास्त पाणी लागत असल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत राहतो. त्यातही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती पिकवीत आहे. त्यामुळे पाऊस आल्यावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलते व शेतीची कामे वेगाने सुरू होऊन तेवढ्याच वेगाने आटोपती करतात.
यंदा मात्र सुरूवातीपासून पावसाने आपला रंग दाखविला. जून महिन्यात पावसाला सुरूवात होऊन शेतीची कामेही मोठ्या झपाट्याने सुरू होतात. मात्र जून महिना कोरडाच गेला व त्यामुळे शेतीची कामेही पूर्णपणे ठप्प पडून होती. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामात हात टाकला. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी बघतच बसले. त्यानंतर जुलै व आता आॅगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाने शेतकºयांना साथ दिली व शेतकरी कंबर कसून शेतीच्या कामाला लागला. जुलै महिन्यातील पावसाने शेतीची कामे जोमात सुरू झाली व आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसाने रोवणीच्या कामांना वेग आला.
यातून जिल्ह्यात सध्या ८५ टक्के रोवणीची कामे आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
यंदा एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर सर्व साधारण धानाचे क्षेत्र असून त्यातील एक लाख ६७ हजार ९५८.२५ हेक्टरमध्ये रोवणी व आवत्या आटोपल्या आहेत. त्यामुळे आता फक्त १५ टक्के क्षेत्र उरले असून पाऊस सध्या दररोज बरसत असल्याने काही दिवसांत या उरलेल्या रोवण्याही आटोपणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक धान क्षेत्र
जिल्ह्यात एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर धानाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा मात्र एक लाख ६७ हजार ९५८.२५ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय पाहणी केल्यास गोंदिया तालुक्यात ४५ हजार ८१० सर्वसाधारण क्षेत्रातील ३४ हजार १६७ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. गोरेगावतालुक्यात २१ हजार १७० हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ४२६ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ३० हजार ४१६ हेक्टर क्षेत्रातील २४ हजार ७१३ हेक्टरमध्ये, सडक-अर्जुनी तालुक्यात १८ हजार १७२ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ५८०.६० हेक्टरमध्ये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २२ हजार २५५ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ५८०.६० हेक्टरमध्ये, आमगाव तालुक्यात १९ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ४४६.५० हेक्टर क्षेत्रात, सालेकसा तालुक्यात १७ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रातील १५ हजार ६६.१५ हेक्टरमध्ये तर देवरी तालुक्यातील २२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील २० हजार २११ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे.