सायकलभ्रमणातून व्यसनमुक्तीचा संदेश
By Admin | Updated: January 4, 2015 23:13 IST2015-01-04T23:13:48+5:302015-01-04T23:13:48+5:30
कोणतेही व्यसन नसलेली एकही व्यक्ती नाही असे घर सापडणे आता दिवसेंदिवस कठीण होत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यापासून दूर जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही.

सायकलभ्रमणातून व्यसनमुक्तीचा संदेश
असेही झपाटलेपण : दोन लाख किलोमीटरचा प्रवास पूर्णत्वाकडे
गोंदिया : कोणतेही व्यसन नसलेली एकही व्यक्ती नाही असे घर सापडणे आता दिवसेंदिवस कठीण होत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यापासून दूर जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मात्र व्यसनमुक्तीचा संदेश घेत कर्नाटकातील चिकतिरुपती या गावातील अमरदीप सिंग हे चक्क सायकलने देशभ्रमंती करीत आहेत. गेल्या ८ वर्षांपासून त्यांना या कामाने झपाटले आहे. यातूनच त्यांनी १ लाख ९५ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
गेल्या आठ वर्षापूर्वी अमरदीप यांच्या मामाचा व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यू झाला. या घटनेने त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येयच बदलून टाकले. व्यसनमुक्त भारत करण्याचा संदेश देत अमरदीप सिंग हे आपल्या सायकलने घराबाहेर पडले. त्यांची पत्नी बंगलोरला शिक्षिका आहे तर मुलगा न्युयॉर्कमध्ये डॉक्टर आहे.
मध्यप्रदेशमार्गे सिंग गोंदियात पोहोचलेल्या सिंग यांनी सांगितले की, १ जानेवारी २००६ रोजी त्यांनी आपली सायकलयात्रा सुरू केली. व्यसनांचे दुष्परिणाम लोकांना सांगून त्यापासून त्यांना परावृत्त करावे हा एकमेव उद्देश घेऊन त्यांनी ही यात्रा सुरू केली. पदवीधर असलेले अमरदीप मातृभाषा पंजाबीसोबतच कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंदी आणि इंग्रजी बोलू शकतात. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांमधील २५ हजार शाळांना भेट दिली आहे.
अमरदीप सिंग हे आपल्या या कामाने इतके झपाटले आहे की ते दररोज १०० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करतात. वाटेत शाळा-महाविद्यालयांना भेटी देतात. विद्यार्थ्यांना, नागरिकांना व्यसन करू नये असा संदेश देतात.
दररोज सकाळी उठून ते आपला स्वयंपाकसुद्धा स्वत:च करतात. त्यासाठी लागणारे साहित्यही त्यांच्या सोबत सायकलवरच असते. गेल्या ६ वर्षात त्यांनी ६ सायकली बदलल्या आहेत. सतत प्रवास करताना त्यांना ३५ टायर आतापर्यंत बदलवावे लागले. तसेच १५ ट्युब बदलविले आहेत. आपल्या या प्रवाशात त्यांना काही कटू अनुभवही आले. त्यात त्यांचे एटीएम, कधी पैसे तर कधी इतर साहित्य चोरीला गेले. पण ते त्यातूनही मागे हटले नाही. आपला हा संदेश ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. (जिल्हा प्रतिनिधी)
गिनिज बुकसाठी नामांकन
सिंग यांनी आतापर्यंत १ लाख ९५ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला आहे. पंजाबमधील अमृतसर येथून त्यांनी हा प्रवास सुरू केला होता. त्यांनी जम्मु-काश्मिर, हरियाणा, नवी दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमन दीव, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही शाळांना भेटी देत प्रवास केला आहे. यासाठी त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकित झाले आहे. मार्च २०१५ मध्ये त्यासाठी त्यांना मुंबईत आमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुलीच्या लग्नातही हजर राहू शकले नाही
आपल्या या जनजागृती मोहिमेत खंड पडू नये म्हणून सिंग जून २०१२ मध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठीही स्वत:च्या घरी गेले नाहीत. त्यांनी केवळ मोबाईल फोनने मुलीला आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे स्वत:सोबत लॅपटॉप वापरणाऱ्या सिंग यांना जगात होणाऱ्या सर्व घडामोडींची कल्पना आहे. फेसबुक अकाऊंटनेही ते एक हजारावर लोकांशी संपर्कात असतात. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबिय त्यांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याला पैसे टाकतात.