क्षय कर्मचारी भत्ते व वेतनापासून वंचित
By Admin | Updated: January 8, 2015 22:58 IST2015-01-08T22:58:01+5:302015-01-08T22:58:01+5:30
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही

क्षय कर्मचारी भत्ते व वेतनापासून वंचित
गोंदिया : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही. तसेच मागील चार महिन्यांपासून हे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.
क्षयरोग हा अत्यंत दुर्धर आजार असून क्षयरूग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार करणे खूप जोखमीचे काम असते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्य करणारे हे कर्मचारी अत्यंत जोखमीचे काम करीत असूनही सदर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. तसेच एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे दैनिक व इंधन भत्ता देयकही थकीत आहे. त्यामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावर विपरित परिणाम होत आहे. सदर अस्थायी-कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन अत्यल्प असून सर्व कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्याचा परिणाम सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावर पडत आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकत्रित असलेले सर्व वेतन, प्रवासभत्ते व इतर भत्ते डिसेंबर २०१४ अखेरसुद्धा मिळाले नाहीत. त्यामुळे १ जानेवारी २०१५ पासून क्षयरूग्णांबाबत कसल्याही प्रकारची रिपोर्टिंग व मिटिंग केली जाणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र सर्व कर्मचारी क्षयरूग्णांना सुविधा देतील व उपचाराबाबत कसलीही हेळसांड केली जाणार नाही, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोय नियंत्रण कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना देण्यात आले आहे. याशिवाय निवेदनाच्या प्रति आरोग्य विभाचे संचालक, मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात सर्व क्षय कर्मचाऱ्यांचे आतापर्यंतचे रखडलेले सर्व वेतन व सर्व भत्ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी क्षयरोग विभागातील कर्मचारी भोजेंद्र बोपचे, पवन वासनिक, राजू मेश्राम, संजय रेवतकर, हरिश चिंधालोरे, संजय भगवतकर, रामचंद्र लिल्हारे, योगिता अडसड, रिजवाना शेख, पंकज लुतडे, अमित मंडळ, दिनेश डोंगरवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)