व्यवहार ठप्प, नागरिकांची तारांबळ

By Admin | Updated: November 10, 2016 00:28 IST2016-11-10T00:28:21+5:302016-11-10T00:28:21+5:30

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच नकली नोटांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा

Deal jam, cigarettes of citizens | व्यवहार ठप्प, नागरिकांची तारांबळ

व्यवहार ठप्प, नागरिकांची तारांबळ

गोंदिया : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच नकली नोटांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. अचानक झालेल्या या निर्णयामुळे मोठ्या व्यापाऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचीच बुधवारी तारांबळ उडाली. सर्व मोठे व्यवहार ठप्प पडले होते. एवढेच नाही तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही दिवस ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटा चालतील असे स्पष्ट करण्यात आले तरी त्या नोटा स्वीकारण्यास काही ठिकाणी नकार दिल्याने नागरिक हतबल झाले होते.
रात्रीपासूनच लोकांमध्ये आता माझ्या पैश्याचे काय होणार अशी धास्ती निर्माण झाली होती. जो-तो पेट्रोल पंप, रुग्णालय किंवा रेल्वे तिकीट खरेदी करताना १० रूपयांच्या व्यवहारासाठीही ५०० किंवा १००० ची नोट देताना दिसत होते. परंतु चिल्लर उपलब्ध नसल्याचे सांगत त्या नोटा घेण्याचे बहुतांश ठिकाणी टाळण्यात आले.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे एकीकडे कौतुक होत असले नोटांच्या चलनासंबंधी नागरिकांमध्ये अनेक गैरसमजुतीही दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण नागरिकांकडून मोदी सरकावर टिकाही ऐकायला मिळत होती. आयुष्यभर राबराब राबून म्हातारपणासाठी पैसे राखून ठेवणाऱ्या ग्रामीण महिला या निर्णयाने जबरदस्त हादरल्या. ग्रामीण भागातील अनेक लोक आजही आपले पैसे बँकेत न ठेवता संदुकात ठेवण्याची परंपरा आहे. शेतीच्या उत्पन्नातून मिळालेले पैसे, छोट्या-मोठ्या कामातून मिळवलेले पैसे बँकेत न टाकता सरळ गल्ला (पिगी बँक) किंवा संदुकात ठेवतात. त्यांना ना एटीएम कार्ड, ना पॅन कार्डची माहिती आहे. ती माहिती मिळविण्याची गरजही त्यांना वाटत नाही.
मंगळवारच्या सायंकाळी शासनाने घेतलेला निर्णय सकाळीच ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच हादरले. सरकारने बँकेत पैसे जमा करण्याचे आवाहन केल्यानंतरही अनेक लोक १० रूपयांचे साहित्य खरेदी करून एक हजारची नोट दुकानदाराला देत होते. परंतु दुकानदारही त्या नोटा नाकारत होते. विशेष म्हणजे किराणा दुकानातील सामान, दैनंदिन वापराच्या वस्तू घेण्यासाठी गेलेल्यांची फजिती झाली. मेहनतीने कमविलेले पैसे खिशात असूनही त्या नोटांच्या मोबदल्यात साहित्य खरेदी करता येत नव्हते. याचा फटका कापड दुकान, किराणा दुकान व अन्य ठिकाणी बसून त्यांची अत्यल्प विक्री झाली.
गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील गौरीशंकर पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक भरतलाल टेंभरे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी रात्रीपासून दुप्पट पेट्रोल विक्री झाल्याचे सांगितले. दररोज आपल्या पेट्रोल पंपवर ४ हजार लीटर पेट्रोल विक्री होते, परंतु आज ८ हजार लीटर विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक व्यवहार ठप्प
कालीमाटी : या परिसरात सामान्य नागरिकांना रोजच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बुधवारी मोठी कसरत करावी लागली.
परिसरात व आमगाव शहरात सकाळी भाजी मंडी, किराणा व्यवसाय, शासकीय कार्यालय व इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दुपारी १२ वाजेनंतर बहुतांश व्यवहार ठप्प पडून शांतता पसरल्याने दिसून आले. कामठा चौक येथील पेट्रोल पंपावर १०० रुपये चिल्लर नसल्याचे कारण सांगून ५०० रुपयांचे पेट्रोल भरणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी नाराजगी व्यक्त केली.
पाचशेच्या नोटांसोबत ओळखपत्राची झेरॉक्स घेत होते. भाजीमंडीत स्वयंरोजगार गॅरन्टीच्या रमेश चोरवाडे यांनी आपल्या ग्राहकांना उधारीवर सेवा उपलब्ध करून दिली. तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते जांगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ५००-१००० रुपये चलनातून हद्दपार झाल्याने ग्रामीण नागरीकांचे कार्यालयीन व्यवहार झालेच नाही.
शेतकरी-शेतमजुरांना फटका
तिरोडा : तालुक्यात ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याने ग्रामीण भागात मोठा फटका बसला. शेतकरी, शेतमजूर, ट्रॅक्टर चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मजूर वर्गाना किराणा, औषधीच्या कामासाठी इकडे-तिकडे भटकावे लागले. दररोज सकाळी उठून दुकान गाठणाऱ्यांना दुकानदाराने ५०० रुपयांच्या नोटा परत केल्या. यामुळे मजूरही भयभीत झाले होते. आमचे कसे होणार असा त्यांचा प्रश्न होता.
काहींनी दाखविले धाडस
सालेकसा : एकीकडे ५०० आणि हजाराच्या नोटांचे आदान-प्रदान थांबले तर त्याचबरोबर मोठ्या रकमेची देवाण-घेवाण पूर्णत: ठप्प झालेली दिसून आली. मात्र छोटी व चिल्लर देवाण-घेवाण आणि खरेदी विक्री सुरू राहीली. एकंदरीत दिवसभर व्यापार व्यवसायाला मोठा फटका बसला तर अनेकांना आपल्या गरजेच्या वस्तुंपासून मुकावे लागले. काही लोकांनी समजुतदारपणा दाखवित छोट्या व्यवहारात ५०० रुपयांची नोट स्वीकारण्याचे धाडससुध्दा दाखविले.
काही दुकानावर तर दिवसभर शुकशुकाट दिसून आला. परंतु ज्यांच्याकडे फक्त ५०० आणि १०० च्या नोटा आहेत, त्यांना नोटांची विल्हेवाट लावण्याची चिंतासुध्दा दिसून येत होती. पेट्रोल पंपावर ५०० रुपयाची नोट स्वीकार करण्यात आली, परंतु ५०० पेक्षा कमी मुल्याचे पेट्रोल भरणाऱ्या लोकांना सुटे पैसे परत करण्याची अडचण निर्माण झाली. त्यामुळे अनेक ग्राहकांना आपल्या वाहनामध्ये ५०० रुपयाचे पेट्रोल भरण्यास बाध्य व्हावे लागले. रेल्वे स्टेशन, मेडीकल स्टोर्समध्ये चिठ्ठी दाखविताना ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या.
मंडई उत्सवाला फटका
सालेकसा तालुक्यात काही गावात बुधवारी मंडई उत्सव आयोजित करण्यात आला होता. कुणबीटोला (सोनपुरी) या गावी मंडईच्या ठिकाणी जाऊन दुकानदारांशी चर्चा केली असता त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. सरासरीपेक्षा ४० टक्केपर्यंतच व्यापार झालेला दिसून आला. यात कटलरी, सौंदर्य प्रसाधन, भाजीपाला इत्यादी दुकानात कमी विक्री झाली. ग्राहकांना आवडत्या वस्तु खरेदी करण्यापासून मुकावे लागले. हॉटेल व्यवसाय मध्यम चालताना दिसून आला. अनेक लोक आपल्या खिशात ५०० आणि १००० रुपयाची नोट घेवून वणवण फिरताना दिसून आले. अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते.
सीमा तपासणी
नाक्यावर रांगा
सिरपूरबांध : ५००-१००० च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे छत्तीसगड-महाराष्ट्र या सीमा तपासणी नाक्यावर वाहधारकांची तारांबळ उडाली आहे. सिरपूरबांध (देवरी) येथे असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर बीओटी तत्वावर टोल वसूलकर्त्या कंपनीतर्फे ५०० व १००० च्या नोटा ट्रकचालकांकडून घेण्यास नकार दिल्यामुळे चालक हतबल झाले होते. बँक, एटीएम बंद असल्यामुळे नोटा कुठून आणाव्या असा प्रश्न पडला. परिणामी नाक्यावर गाड्यांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाच्या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे चालक वर्गाना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तपासणी नाक्यावर कार्यरत सुरक्षा गार्डाच्या आधीच ५-६ दिवसांपासून संपावर असल्याने आणि सदभाव कंपनीच्या नियोजनाअभावी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. परंतु कंपनीतर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही.




१० रूपयांच्या रिचार्जसाठी एक हजाराची नोट
कोणत्याही मार्गाने आपल्याजवळील ५०० व १००० ची नोट कामी लावायची या बेतात लोक आपल्याजवळील नोटा खपविण्यासाठी प्रयत्न करू लागले. १० किंवा २० रूपयाच्या खरेदीसाठी ५०० व १००० ची नोट देऊ लागले. त्यामुळे व्यापारीही त्रस्त झाले. १० रूपयाच्या मोबाईल रिचार्ज व्हाउचरसाठी १ हजारची नोट देण्यासाठी अनेक ग्राहक आल्याची माहिती किराणा व्यापारी ठाकूरदास तेजवानी यांनी दिली.
१००० रूपयांमागे ८०० देणारे महाभाग सक्रिय
मोदी सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी त्यातूनही गैरमार्गाने पैसे कमविण्याचा उपाय काही महाभागांनी शोधून काढला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एक हजार रूपयाची नोट चालविण्यासाठी २०० रूपये नुकसान सहन करण्याची त्यांची तयारी करून त्यांच्याकडून पैसे घेतले जात आहे. अनेकांनी ५०० रूपयाची नोट आणा व ४०० रूपये घेऊन जा, आणि १००० ची नोट आणा व ८०० रूपये न्या, असा गोरखधंदा सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल पंपावर ५०० किंवा हजार रूपयांची नोट चालेल असे सरकारने जाहीर केल्यामुळे एक लीटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी आलेले प्रत्येक वाहनचालक हजार किंवा ५०० रूपयांची नोट घेऊन येत होते. मात्र चिल्लर नाहीत असे सांगून सरळ ५०० किंवा एक हजार रूपयाचे पेट्रोल टाका असे वाहनधारकाला बजावले जात होते. यात पेट्रोलपंप मालक, चालक व वाहन चालकांत खटकेही उडताना दिसत होते. नाईलाजास्तव वाहन चालकांना ५०० रूपयांचे पेट्रोल भरावे लागत होते. यामुळे पेट्रोलची विक्री दुपटीने झाली.

Web Title: Deal jam, cigarettes of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.