तलावातील बेटांमुळे सारसांचे संवर्धन

By Admin | Updated: November 5, 2016 01:22 IST2016-11-05T01:22:31+5:302016-11-05T01:22:31+5:30

बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे.

Cultivation of storks due to lake pond | तलावातील बेटांमुळे सारसांचे संवर्धन

तलावातील बेटांमुळे सारसांचे संवर्धन

तलावातील बेशरम नष्ट : वनालगतच्या तलावांत गाळ पेरणी बंद करा
गोंदिया : बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे. सारसापासून मनूष्य किंवा प्राणी दूर राहावेत यासाठी सारसांचे अधिष्ठाण असलेल्या तलावांच्या मध्यभागी बेट तयार करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. या बेटावर सारसाने अंडी घातल्यास त्या अंडी पर्यंत कुणाला पोहचता येणार नाही. प्राणीही त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही.
गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येतात म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील तलावांची स्थिती चांगली आहे. परदेशात बर्फ पडते तेव्हा पक्ष्यांना खाद्य कमी पडते म्हणून ते आपल्या देशात खाद्य शोधण्यासाठी येतात. ज्या बोड्या तलावाता खाद्य मिळते त्यात ते वास्तव्य करतात. आपल्या तलावांमध्ये गाद, खस, चिला, एक्वेटी प्लांटमध्ये मूळाला खोदून खातात. कमलकंद, कमलगट्टे, बोळुंदा हेच खाद्य सारसालाही लागते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी सारस येतात. अंडी घालने, बच्चे पालने धानाच्या शेतात करतात. तेव्हा त्यांना किटक, छोटे साप, सरडे पिल्लांना भरवायला मिळतात. त्यामुळे त्या पिल्लांची वाढ होते.
शेतातच मालगुजारी तलाव असल्याने या तलवांत असलेल्या बेटाचा फायदा सारसांना होतो. रात्री विश्रांती घेतांना बेटाची फार आवश्यकता असते. कारण बेट असेल तर त्यांना सुरक्षीत वाटते. फिडींग करताना आजूबाजूला कुणी दिसले तर ते बेटाचा वापर करतात. माणूस, वन्यप्राणी यापासूनही सारस आपली अंडी व पिल्लांचा बचाव करतात. परसवाडा तलावावर बेट तयार करण्यात आला. झिलमीली तलावावर बेट तयार करण्यात येणार आहे. तलावात मधल्या भागात एक बेट असावे.
नवेगावबांधच्या श्रृंगारबोडीतही बेट केला आहे. इतर सात ते आठ तलावांमध्ये बेट तयार करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे असे मुकुंद धुर्वे यांनी सांगितले. तलावातील बेशरममुळे अन्न शोधायला पक्ष्यांना कठीण जाते व शिकाऱ्यांना लपायला संधी मिळते. त्यामुळे बेशरमची झाडे काढणे आवश्यक आहे.
मानवाच्या हस्तक्षेपाने व अतिक्रमणाने दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी व्हायला लागली. हा मोठा प्रश्न आता पक्षी मित्रांना विचार करायला भाग पाडत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकांनीे आज आहे त्याच परीस्थितीत जतन करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कृती सुरू असल्याने पुन्हा गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.
तलावाच्या आजूबाजूला असलेल्या गावातील काही लोक आर्थिक फायद्यासाठी तलावातून कमळनाल मोठ्या प्रमाणात काढून विकतात. त्यांचा ग्राहक वर्ग वाढल्याने समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच वनस्पती वर अनेक पाणपक्षी आपली घरटी तयार करतात. त्यावर वास्तव्य करणारे अनेक किटक या पाणपक्ष्यांना व त्यांचा पिल्यांना खायला मिळतात.
पाण्यावर त्या वनस्पतींच्या पाणाची आच्छादन मिळाल्याने पाणी गरम न होता त्यांना आवश्यक असलेले तापमान कायम राहते. शिकारी पक्ष्यांपासून त्यांच्या पिल्यांचे रक्षण करायला मदत होते. पूर्ण तलावाच्या भागापैकी काही भाग पक्ष्यांसाठी सुरक्षित करून अल्प प्रमाणात लोकांना परवानगी देवून त्या पक्ष्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जवाबदारी सोपविण्याची गरज असते. सारस संवर्धनासाठी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष चेतन बजाज, सचिव अशोक पडोळे, संजय आकरे, उमेंद्र भेलावे व इतर वन्यप्रेमीकडून प्रयत्न केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cultivation of storks due to lake pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.