ग्रामीण भागात तयार होत आहेत कोरोनाचे हाटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:38+5:30
कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसाच्या अंतरात तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमधून रेडझोनमध्ये परार्वतीत झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे मुंबई, पुणे या रेडझोन मधून आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शासनाने विविध जिल्ह्यात आणि राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास परवानगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुंबई येथे रोजगारासाठी गेलेले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६७ मजूर स्वगृही परतले. यापैकी २५ मजूर कोरोना बाधित आढळले. तर उर्वरित मजुरांचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सडक अर्जुनी, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, गोंदिया, तिरोडा या सात तालुक्यात सुध्दा कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने याच भागात आता कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसाच्या अंतरात तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमधून रेडझोनमध्ये परार्वतीत झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे मुंबई, पुणे या रेडझोन मधून आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शासनाने विविध जिल्ह्यात आणि राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास परवानगी दिली. या कालावधीत जिल्ह्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून ७ हजार ५४६ नागरिक परत आले आहे. रोजगारासाठी मोठ्या शहरात व राज्यांमध्ये गेलेले नागरिक मागील दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परतत आहे. यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात जे एकूण ३९ रुग्ण आढळले ते सर्व मुंबई, पुणे आणि इतर राज्यातून आलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वगृही परतल्यानंतर याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नाही. ते थेट स्वत:च्या घरी गेले. त्यांची आरोग्य तपासणी सुध्दा झाली नाही. त्यामुळेच कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात २६ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यात ५, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा १ रुग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातीलच असल्याने आता ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाची अपडेट माहिती देण्याची जबाबदारी कुणाची
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मागील तीन दिवसांपासून कोरोनाची अपडेट माहिती देण्यास विलंब केला जात आहे.सकाळी आलेल्या अहवालाची माहिती रात्री ९.३० वाजता दिली जाते. तर ज्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती देण्याची जबाबदारी सोपविली आहे ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा फोन उचलत नाही. शिवाय यासाठी तयार केलेल्या व्हाटसअॅप ग्रुपवर सुध्दा अपडेट देत नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडत असून यामुळे लोकांमध्ये सुध्दा काहीजण चुकीचे संदेश पाठवून दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे कोरोनाची अपडेट माहिती देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे हे कळण्यास मार्ग नाही.
अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अॅलर्जी
कोरोना संदर्भातील अचूक माहिती जनतेपर्यंत जावी, त्यामुळे गोंधळ निर्माण होवू नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी, नोडल अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी सुध्दा फोन उचलत नाही. आठ ते दहा वेळा फोन केल्यानंतरही साधा रिप्लाय दिला जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अॅलर्जी झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माहिती न देण्याचे फर्मान कुणाचे?
आरोग्य विभाग किंवा कोरोना उपाययोजनेशी निगडीत कोणत्याही विभागाला माहिती घेण्यासाठी फोन लावल्यास माहिती न देण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले असल्याचे ते सांगतात. मात्र कोरोना अपडेट संदर्भातील वास्तविक माहिती देण्यास नेमकी अडचण काय तसेच विविध विभागांना माहिती न देण्याचे फर्मान नेमके कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे आहे किंवा संबंधित अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत हे समजण्यास मार्ग नाही.
प्रशासन सुद्धा गोंधळले
जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासन सुध्दा काहीसे सुस्त झाले होते. मात्र तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हा प्रशासनाची पूर्णपणे तारांबळ उडाली आहे. क्वारंटाईन सेंटरसह तेथे सुविधा निर्माण करुन देण्यावरुन सावळा गोंधळ कायम आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा अभाव असल्याची माहिती आहे. तर कोणते क्षेत्र नेमके बफर झोन आणि कंटोमेंट झोनमध्ये आहे याची माहिती प्रशासनच्या स्थानिक कर्मचाºयांना नसल्याने त्यांचीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.