रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:22 IST2017-11-17T22:22:23+5:302017-11-17T22:22:43+5:30
जिल्ह्यात अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले असल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वत्र आहे.

रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडउमरी : जिल्ह्यात अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले असल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वत्र आहे. याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
अनेक रेती घाटांचे लिलाव बंद झाले आहेत. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना रेती अधिक दराने खरेदी करावी लागत आहे. ट्रॅक्टर मालकांना व मजुरांना रेतीमुळे कामे मिळत होती. ते काम आज शासनाने बंद केले आहे. रेती घाटांचे लिलाव बंद असल्याने त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना महागड्या दराने रेती खरेदी करावी लागत आहे. त्वरित रेती घाटांचे लिलाव करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेती अभावी अनेक घरकुलांचे अर्धवट बांधकाम झाले आहे. त्यामुळे देयक काढण्यासाठी लाभार्थ्यांना मोठी अडचण जात आहे. रेतीशिवाय घराचा पाया व भिंत होऊ शकत नाही. यामुळे गोरगरिब लाभार्थ्यांना गरजेपोटी अतिरिक्त पैसे मोजून रेती खरेदी करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. रेतीचा वापर घरकूल, शाळा, शासकीय इमारतकरिता होतो. प्रत्येकाला घरकूल योजनेचा लाभ मिळावा, असे शासनाचे धोरण आहे. मात्र शासनाच्या काही धोरणांचा फटका गोरगरिबांना बसत आहे. रेतीअभावी होणारी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची समस्या विचारात घेवून जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.