पैसे भरूनही कनेक्शन कापले
By Admin | Updated: January 4, 2015 23:14 IST2015-01-04T23:14:16+5:302015-01-04T23:14:16+5:30
पैसे भरल्यानंतरही त्याची पावती नसल्याच्या कारणातून तालुक्यातील ग्राम माल्हीच्या ग्राम पंचायतने १४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. मागील चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईने

पैसे भरूनही कनेक्शन कापले
आमगाव : पैसे भरल्यानंतरही त्याची पावती नसल्याच्या कारणातून तालुक्यातील ग्राम माल्हीच्या ग्राम पंचायतने १४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. मागील चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईने नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
या नागरिकांचे नळ कापण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे यांनी अनामत रक्कम एक हजार रुपये व वार्षिक ४२० रुपये ग्रामापंचायत कार्यालयात भरले नाही. यामुख्य कारणामुळे मागील महिन्यात झालेल्या मासिक सभेत निर्णय होऊन त्यांना नोटीस देण्याचे व नंतर नळ कनेक्शन कापण्यात येईल असे मासिक सभेत ठरले.
सभेत ठरल्यानुसार गावातील रोशन पारधी, ताराचंद चुटे, महादेव पारधी, मालन सयाम, माधोराव कठाणे, बाबूराव रहिले यांच्यासह १४ नळ कनेक्शनधारकांना नोटीस देण्यात आले. नंतर या १४ जणांचे पैसे नळ कनेक्शनकरिता भरल्याची नोंद किंवा पावती कापण्यात आली नाही, असा ठपका ठेऊन त्यांचे नळ कापण्यात आले.
विशेष म्हणजे या १४ जणांकडे सुमारे एक वर्षापासून नळ सुरू होते. जर यांनी पैसे भरले नाही तर ग्रामपंचायतने त्यांना नळ कनेक्शन कसे दिले, हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. नळ प्राधिकरण विभागामार्फत ग्रामपंचायतला पाणी पुरवठा देण्यात आला आहे. नियमाप्रमाणे नळ कनेक्शनसाठी अगोदर अनामत रक्कम भरून पावती घ्यावी लागते. जर वरिल १४ नागरिकांनी पैसे भरले नाही तर त्यांना एक वर्षापूर्वी नळ कनेक्शन कोणाच्या परवानगीने देण्यात आले. तसेच एक वर्ष त्यांनी पिण्याचे पाणी कशाप्रकारे उपयोगात आणले. तेव्हा ग्रामपंचायतच्या लक्षात हे अवैध नळ कनेक्शन लक्षात का आले नाही. आताच हा मुद्दा उपस्थित करून नागरिकांचे नळ कनेक्शन का कापण्यात आले अशा चर्चांना गावात पेव फुटले आहे.
या नागरिकांनी नळ कनेक्शनचे पैसे दिले. मात्र त्या पैशांची रसीद किंवा नोंद घेण्यात आली नाही. यात १४ नागरिकांचे प्रत्येकी एक हजार अनामत रकमेनुसार १४ हजार रुपयांची अफरातफर झाली हे निश्चित आहे. आता गावात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र नागरिकांकडे पैसे दिल्याची नोंद किंवा पावती नसल्याने मासिक सभेत ठराव घेऊन नळ कनेक्शन कापण्यात आल्याने नागरिकात व्यापक रोष निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)