कंटोनमेंट झोनमधील गर्रावासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खबरदारी म्हणून प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील गर्रा या गावाला सील केले आहे. नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध ...

The condition of the villagers in the cantonment zone | कंटोनमेंट झोनमधील गर्रावासीयांचे हाल

कंटोनमेंट झोनमधील गर्रावासीयांचे हाल

ठळक मुद्देप्रशासनाकडून कसलीच व्यवस्था नाही : जीवनावश्यक वस्तूंअभावी उपासमारीची पाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खबरदारी म्हणून प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील गर्रा या गावाला सील केले आहे. नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले. मात्र, या कालावधीत गावातील गरीब कुटुंबीय पोट कसे भरणार? याचा विचार करण्यात आला नाही. गावातील जवळपास ४० टक्के कुटुंबीय प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. तहसीलदारांनी गावातच सर्व सोयी उपलब्ध करु न देऊ असे आश्वासन दिल्यानंतरही गावात कुठल्याच जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली नाही. उलट तहसीलदारांशी संपर्क केल्यावर त्यांचे सहकारी भ्रमणध्वनी घेत साहेब बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत टोलवाटोलवी करु लागल्याने गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ग्राम गर्रा बु. येथील एक युवक छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे १ मे रोजी कोरोना बाधित आढळला. तो युवक २९ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान गर्रा गावात असल्याने गर्रा परिसरातील गर्रा खुर्द व बुज. ही दोन गावे कंटोनमेंट झोन म्हणून तर गोंडीटोला, शिवनीटोला, रावणवाडी, घिवारी व शिवनी ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गावात येण्या-जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.गर्रा गावाला प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आल्याने येथील कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बाधित युवकाच्या नात्यातील व संपर्कात आलेल्यांना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शासकीय अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान पाठविलेल्या नमुन्यांपैकी त्या युवकाच्या आई-वडील, बहिण व इतरांचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. असे असले तरी तालुका प्रशासनाने तो व्यक्ती २९ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत गावी असल्याने दक्षता म्हणून ती गावे अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. मात्र, गावातील वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या हाताला काम नाही व रोजगारासाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच पशुंना चारा उपलब्ध नसल्याने नागरिकांकडील पशुधन धोक्यात आले आहेत. प्रशासनाने परिसराला अतिसंवेदनशिल घोषित करून पाबंदी लावण्यात आली. मात्र, नागरिकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. याला आठवडाभराचा कालावधी लोटला. त्यातच गावातील सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहे. असे असतानाही प्रशासनाच्यावतीने सवलत दिली जात नसल्याने रोष व्याप्त आहे.

Web Title: The condition of the villagers in the cantonment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.