कालव्याचा बोगदा तोडून सायपण रस्ता तयार करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:04+5:302021-03-19T04:28:04+5:30
गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार ...

कालव्याचा बोगदा तोडून सायपण रस्ता तयार करा ()
गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यातून पाणी झिरपत असल्याने पाणी साचून राहते. त्यामुळे शेतकरी व इतरांना आवागमन करताना त्रास सहन करावा लागतो. कालवा बोगदा तोडून त्याऐवजी सायपन रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी चिंतामन बिसेन यांनी केली आहे.
उजव्या कालव्यातून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वितरित करण्यात येते. हिरडामाली ते पुनर्वसन गावांसाठी या कालव्यावर बोगदा तयार करून रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्यावर बोगदा करू नये, त्याऐवजी सायपन रस्ता करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व बोगदा तयार केला. या बोगद्याची कामे निकृष्ट झाल्याने कालव्याचे पाणी सतत झिरपत असते. त्यामुळे या बोगद्याखाली पाणी साचलेले असते. पाणी साचवून राहत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बोगद्याची १० वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. अनेकदा याकडे लक्ष वेधून समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. परंतु आश्वासनाशिवाय काहीही झाले नाही. हिरडामाली व गोरेगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या बोेगद्याखालील रस्त्याच्या वापर शेतकरी करीत आहेत. या बोगद्याखालून दुचाकी वाहने चालविता येत नाही. पायी जाणेही शक्य नाही, त्यामुळे कालव्यावरील बोगदा तोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सायपण रस्त्याची गरज आहे.
हिरडामाली पुनर्वसन गाव, गोरेगावच्या शेतकऱ्यांनी आपली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याने कृषी संघटनेचे अध्यक्ष चिंतामन बिसेन यांनी सायपण रस्त्याची मागणी उचलून धरली आहे.