दोन्ही आगारांना १७ लाखांचा फटका
By Admin | Updated: December 19, 2015 01:45 IST2015-12-19T01:45:43+5:302015-12-19T01:45:43+5:30
वेतनवाढीच्या मागणीला घेवून अनिश्चितकाळासाठी आंदोलनात उतरलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला.

दोन्ही आगारांना १७ लाखांचा फटका
डोकेदुखी दूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला
गोंदिया : वेतनवाढीच्या मागणीला घेवून अनिश्चितकाळासाठी आंदोलनात उतरलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला. त्यामुळे तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला व त्वरित कामाला सुरूवातही केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांना घेवून १६ डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) वतीने कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीला घेवून सदर आंदोलन सुरू करण्यात आले होते. गोंदिया आगारात या संघटनेचे बोटावर मोजन्याएवढे कर्मचारी आहेत. त्यामुळे गोंदियात या संघटनेच्या आंदोलनाचा काही विशेष जोर दिसून आला नाही. परंतु बाहेर गेलेल्या बसेस तिथेच अडून राहिल्या. आता आंदोलन समाप्त होताच त्या बसेस आता परतण्यासाठी स्वतंत्र झाल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्यानुसार संपूर्ण दिवसभरात जवळपास ४०० फेऱ्या होवू शकल्या नाही. तसेच एवढ्याच फेऱ्या गोंदिया बस स्थानकावर पोहचू शकल्या नाही. संप संपताच सायंकाळच्या वेळी विविध ठिकाणांसाठी बसेस सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. गोंदिया आगाराचे दोन्ही दिवसात जवळपास १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
तिरोडा आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन संपल्याची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार फटाकेबाजी करून आनंद व्यक्त केला. संप संपल्यावर सर्व कर्मचारी आपल्या कामावर परत गेले व १८ डिसेंबरच्या सायंकाळी तिरोडा आगारातून हाल्टिंग बसेस आपल्या गंतव्य स्थळाकडे रवाना झाले.
तिरोडा आगाराची अकोला बस नागपूर, चंद्रपूर व वर्धासाठी निघालेल्या बसेस त्याच ठिकाणी अडून होत्या. या बसेस तिरोड्याकडे परतण्यासाठी निघालेल्या आहेत. या आंदोलनामुळे तिरोडा आगाराला जवळपास सात लाख रूपयांचा नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)