अजून ५० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम बाकी
By Admin | Updated: May 20, 2014 23:46 IST2014-05-20T23:46:42+5:302014-05-20T23:46:42+5:30
गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे.

अजून ५० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम बाकी
गोंदिया : गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे. नोव्हेबर २०१३ मध्येच या योजनेला पूर्ण करावयाचे होते. मात्र अद्याप योजना पूर्ण झालेली नसून आणखी सहा महिने तरी ही योजना पूर्णत्वास येणार नसल्याचे दिसत नाही. अजून ५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदले जाणार आहेत. यामुळे दोन महिन्यात ही योजना पूर्णत्वास जाईल, असा दावा किती खोटा आहे हे स्पष्ट होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरातील पाण्याची समस्या सुटावी यासाठी शासनाने सुमारे ८० कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना गोंदियाला भेट दिली. सन २००९ मध्ये या योजनेला सुरूवात झाली असून पहिल्या टप्यात डांगोर्ली ते कुडवा दरम्यानच्या मुख्य पाईपलाईनचे काम व पाणी टाकीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सन २०११ मध्ये शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर योजनेची पाईपलाईन टाकावयाची असून हे एकूण २३४ किलोमीटर अंतर असणार आहे. यात काही निर्जन भागांचा समावेश आहे. त्याला वगळल्यास सुमारे २०० किमी रस्ते खोदून त्यात पाईप लाईन टाकावयाची आहे. मात्र अद्यापही हे काम सुरूच आहे. यातील सुमारे ५० किमी. रस्त्यावर पाईपलाईन टाकणे सध्या शिल्लक आहे. वास्तविक पाहता निविदेत नमुद केल्यानुसार नोव्हेंबर २०१३ मध्येच ही योजना पूर्ण करायची होती. मात्र आतापर्यंत या योजनेचे काम सुरूच असल्याने शहरवासीयांसाठी ही योजना दिवास्वप्न ठरत आहे. या योजनेचेही काहींनी राजकारण करून टाकले आहे. येत्या दोन महिन्यांत योजनेचे लोकार्पण करणार असल्याचे आश्वासन देत आहे. मात्र योजनेची आजची स्थिती बघितल्यास आणखी सहा महिने तरी या योजनेची पूर्तता होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येते. (शहर प्रतिनिधी)