बाजार समित्यांमध्ये कृषीमालाची आवक मंदावली
By Admin | Updated: November 12, 2016 00:28 IST2016-11-12T00:28:02+5:302016-11-12T00:28:02+5:30
शेतकऱ्यांचा कृषीमाल विक्रीसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मालाची आवक मंदावली आहे.

बाजार समित्यांमध्ये कृषीमालाची आवक मंदावली
चुकाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर : शेतकऱ्यांची धान विक्री बाहेरील केंद्रांवर
गोंदिया : शेतकऱ्यांचा कृषीमाल विक्रीसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मालाची आवक मंदावली आहे. विक्री केलेल्या मालाचे पैसे रोख स्वरूपात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
शासन आदेशामुळे सर्वत्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणारा बाहेरी आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे वळत आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी व सर्वाधिक खरेदी करणारी बाजार समिती म्हणून गोंदियातील बाजार समितीची ओळख आहे. मात्र यंदा येथील बाजार समितीत पाहिजे तशी आवक दिसून येत नसल्याचे चित्र आहे. धान खरेदीचा काळ सुरू असूनही बाजार समितीत धान व शेतकरी दिसून येत नाही. शासनाने सर्वत्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केल्याचा हा फटका येथील बाजार समितीला सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत धान विक्री केला त्यांना रोख चुकारे देण्याऐवजी चेकने पैसे दिले जात आहे. चेक नाकारणाऱ्यांना १० ते १५ दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले जात आहे. परिणामी बाजार समितीत धान विक्रीला आणण्यापेक्षा गावातीलच किंवा जवळील केंद्रावर धान विक्रीला शेतकरी प्राधान्य देत आहे.
दिवाळीचा सण बघता शासनानेही धान खरेदीचे आदेश देत धान खरेदी केंद्र सुरू करवून घेतले. यामुळे शेतकरी सुखावला व बाजार समिती मत्र दुखावल्या गेली. येथील बाजार समितीत सध्या सुमारे तीन हजार क्वींटलच्या जवळपास दिवसाला धान खरेदी केली जात असल्याचे कळले.
एकेकाळी धान खरेदीच्या काळात पाय ठेवायला जाग न राहणारी बाजार समिती यंदा धानाची वाट बघत असल्याचेही बोलणे वावगे ठरणार नाही. दूरवरून येथे शेतकरी आपले धान विक्रीला आणत होते. यंदा मात्र शेतकरी केंद्रांकडे वळला असून त्याचा फटका बाजार समितीला बसत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
१ जानेवारीला बाजार समितीचे स्थलांतर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवे मार्केट यार्ड तयार असूनही मागील कित्येक वर्षापासून बाजार समितीचे स्थानांतरण अडून पडले होते. त्यामुळे नवीन यार्ड मधील उरलेले सुरले बांधकाम करवून आता बाजार समिती स्थानांतरणाचा मुहूर्त निघाला आहे. येत्या १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजा समिती स्थानांतरीत करण्याचे ठरले आहे. मात्र ८ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या निवडणुका असल्याने व यात काही अन्य काही अडचण बघता हा मुहूर्त १५ तारखेचा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यंदा बाजार समितीचे स्थानांतरण होणार आहे.