कौशल्यसेतू दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वरदान

By Admin | Updated: September 26, 2016 01:54 IST2016-09-26T01:54:59+5:302016-09-26T01:54:59+5:30

कौशल्य सेतू २०१६’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या जुलै २०१६ मधील फेरपरीक्षेत

Achievement for 10th Grade Students | कौशल्यसेतू दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वरदान

कौशल्यसेतू दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वरदान

मिलिंद रंगारी : ८० टक्के प्रात्यक्षिक व ५० टक्के आकलनावर भर
विजय मानकर  सालेकसा
कौशल्य सेतू २०१६’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या जुलै २०१६ मधील फेरपरीक्षेत तीन किंवा तीनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे. ज्यात ८० टक्के प्रात्यक्षिक व ५० टक्के आकलनावर भर राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार असून याद्वारे ते आत्मविश्वासाने स्वयंरोजगार, रोजगार आणि उच्च तांत्रिक शिक्षण या वाटेने जाऊन प्रगती करू शकतील, अशी माहिती नागपूर शिक्षण मंडळाचे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक समुपदेक प्रा. मिलिंद रंगारी यांनी दिली.
लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत प्रा.रंगारी यांनी सांगितले की, २४ सप्टेंबरला जिल्ह्यातील दहावीच्या वर्गशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यात नागपूर विभागातील नागपूर शहर १३६, नागपूर ग्रामीण ११९, गडचिरोली ४५, चंद्रपूर १३७, वर्धा १०४, भंडारा ९२ व गोंदिया जिल्ह्यातील ७५ शिक्षकांना तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गणपत्रिका वितरित करण्यात आल्या.
मुंबईच्या व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षण देण्यात आले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपची माहिती या वेळी देण्यात आली. उपस्थित सर्व वर्गशिक्षकांना स्मार्ट फोनवर सदर अ‍ॅप डाऊनलोड करून वर्गशिक्षकांनी नोंदणी केली.
२६ सप्टेंबरला शाळेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जातील व वर्ग शिक्षक या विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करुन त्यांच्ये आधार कार्ड लिंक करतील.
संबंधीत डेटा नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी (एनवायसीएस) आणि यशस्वी संस्थेकडे हस्तांतरीत केल्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संपर्क साधतील. (एमएसबीटीई) महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्नीकल एज्युकेशनच्या जिल्हा पातळीवरील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतील.
नंतर सहा महिने कालावधीचा विद्यार्थ्यांच्या पसंतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यात येईल. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम दहावी समकक्ष समजण्यात येईल. तीन किंवा तीनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ‘अनुत्तीर्ण’ या ऐवजी ‘कौशल्य सेतू पात्र’ असे लिहिण्यात आलेले आहे.

काय आहे कौशल्यसेतू योजना ?
कौशल्य सेतूच्या मागचा हेतू काय आहे, याबद्दल विचारले असता प्रा. रंगारी म्हणाले की, इयत्ता दहावीत अनेक विषयात अनुत्तीर्ण होण्याची कारणे वेगवेगळी आहेत, असे लक्षात येते. शिक्षणाच्या आवडीपासून तर कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, आरोग्य व सोयीसुविधांची कारणे असू शकतात. अनुत्तीर्ण विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावतो. तसेच कुटुंब व समाज यांच्याकडून उपेक्षिल्या जातो. प्रगतीची त्याची संधी चुकल्यामुळे शिक्षणाची कपाटे बंद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण होते व शिक्षणाबद्दल त्यांच्यात अनास्था निर्माण होते. त्यांच्या समाजाप्रति अनादर वाढू शकतो, असे विद्यार्थी नैराश्याने ग्रस्त होवून व्यसनाधिनता व गैरमार्गाकडे वळू शकतात. त्यामुळे त्यांना वेळीच सावध करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेली योजना म्हणजे ‘कौशल्य सेतू-२०१६’ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरदान ठरणार ही अपेक्षा आहे.

Web Title: Achievement for 10th Grade Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.