एकाच सातबाऱ्यावर विविध केंद्रांवर धान विक्रीचा आरोप
By Admin | Updated: July 10, 2014 23:40 IST2014-07-10T23:40:17+5:302014-07-10T23:40:17+5:30
महाराष्ट्र शासनाने विविध एजंसीमार्फत उन्हाळी हंगामात निघालेल्या धानपिकांची खरेदी केली. काही व्यापारी व धनदाडंग्या शेतकऱ्यांनी एकाच सातबारावर प्रत्येक धानविक्री केंद्रावर झेरॉक्स प्रती

एकाच सातबाऱ्यावर विविध केंद्रांवर धान विक्रीचा आरोप
अर्जुनी/मोरगाव : महाराष्ट्र शासनाने विविध एजंसीमार्फत उन्हाळी हंगामात निघालेल्या धानपिकांची खरेदी केली. काही व्यापारी व धनदाडंग्या शेतकऱ्यांनी एकाच सातबारावर प्रत्येक धानविक्री केंद्रावर झेरॉक्स प्रती देवून विक्री केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास बिंग फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाने यावर्षी विविध एजंसीमार्फत उन्हाळी धान पिकाची खरेदी केली. सुरुवातीला खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर अल्पावधीतच केंद्र बंद करण्यात आले. केंद्र विलंबाने सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला धान कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विक्री केला. काही मोजक्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने धान विक्री केले नव्हते. मात्र व्यापाऱ्यांचा धान खरेदी केलेला माल विक्रीसाठी शिल्लक होता. याशिवाय गब्बर शेतकऱ्यांजवळही साठा शिल्लक होता.
धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना सातबाराच्या उताऱ्याची आवश्यकता असते. धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांजवळ अमाप साठा असला तरी सातबारा उताऱ्यांची ददात होती. मात्र त्यांना शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर धान विक्री करावयाचे होते.
त्यासाठी त्यांनी सातबाराची जुळवाजळव केली. तरीसुद्धा त्यांच्याकडे धान शिल्लक राहत असल्याने एकाच सातबारा उताऱ्यांचे अनेक झेरॉक्स काढून तालुक्यातील विविध धान खरेदी केंद्रावर स्वत:चे धान विक्री केले. ज्या नावे सातबाराचा उतारा आहे त्याच नावे विक्री केलेल्या धानाचा धनादेश मिळायला पाहिजे. परंतु व्यापाऱ्यांनी कुटुंबातील प्रत्येकाच्या नावाचे सातबारा जोडून एकच धनादेश तयार करुन घेतल्याच्या चर्चा आहेत. खरेदी झालेला धान रिकामे बारदाने देवून शार्टेज दाखविण्यात आला व प्रत्येक व्यापाऱ्याला ३०० ते ४०० कट्टे मागण्यात आल्याचेही बोलल्या जात आहे.
मिलींग करण्यासाठी व्यापाऱ्यांना धान देतांना फेडरेशन ६०० ग्रॅम रिकाम्या बारदान्याचे वजन देतो. मात्र धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान खरेदी करताना प्रत्येक पोत्याचे एक किलो वजन कपात केले जाते. यात मार्केटिंग फेडरेशनसुद्धा हित जोपासत असल्याचा आरोप होत आहे. धान खरेदी केलेले सातबारा उतारे व शेतकरी अथवा व्यापाऱ्यांना देण्यात आलेले धनादेश याचा तपशील तपासणी केल्यास सत्य उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्केटिंग फेडरेशनसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
(तालुका प्रतिनिधी)