पालिकेचे सफाई अभियान संपेना

By Admin | Updated: July 10, 2014 23:39 IST2014-07-10T23:39:35+5:302014-07-10T23:39:35+5:30

पालिकेचे मान्सून पूर्व सफाई अभियान अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे की, नेहरू चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा (ओपनिंग) उघडून अंडरग्राऊंड नालीची सफाई करण्यात आली आहे.

Abolish the municipal cleanliness campaign | पालिकेचे सफाई अभियान संपेना

पालिकेचे सफाई अभियान संपेना

गोंदिया : पालिकेचे मान्सून पूर्व सफाई अभियान अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे की, नेहरू चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा (ओपनिंग) उघडून अंडरग्राऊंड नालीची सफाई करण्यात आली आहे. त्याचा गाळ मागील चार दिवसांपासून तसाच पडून आहे. मात्र त्याची उचल करण्याचा स्वच्छता विभागाला भान नाही. यामुळे पालिकेचे सफाई अभियान अद्याप संपले नसून नाल्यांची सफाई सुद्धा झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे स्वच्छता विभाग नेमकी कसली सफाई करीत आहे हेच कळत नसल्याचे चित्र आहे.
पालिके ने शहरातील मोठ्या नाल्यांची जेसीबी द्वारे सफाई केल्याचा गाजावाजा करून फोटो छापून घेतले. मान्सून पूर्व सफाई अभियान असे यास नाव देण्यात आले. मात्र आता पावसाळा लागला असतानाही शहरातील मोठे नाले व लहान नाल्यांचीही सफाई झाल्याचे दिसून येत नाही. अशात हे सफाई अभियान फक्त काही नाल्यांपुरतेच मर्यादीत होते का असा सवाल शहरवासी करीत आहेत. कारण बहुतांश भागातील नाले अद्याप क चरा व गाळाने तुंबलेले असून येथे मात्र पालिकेची जेसीबी पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.
त्यात आता आश्चर्याचा दुसरा धक्का असा की, शहरातील नेहरू चौकात बाजारकडे येणाऱ्या मार्गावरील जुने पूल तोडून त्यावर नवे पुल बांधण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी महिनाभर लावण्यात आला. त्या काळात या मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. आता या पुलाचे बांधकाम झाल्यावर मागील दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा
(ओपनिंग) उघडून येथील अंडरग्राऊंड नाल्याची सफाई करण्यात आली. म्हणजेच तेव्हा पालिकेच्या सफाई विभागाला नाल्यातील गाळ काढण्याचा मुहूर्त मिळाला नव्हता असे दिसून येते.
चला गाळ काढण्यात आला तर आला, मात्र त्याची उचल करून रस्ता मोकळा करणे गरजेचे होते. परंतु याकडेही स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले व नाल्यातील गाळ रस्त्याच्या मधोमध तसाच पडून आहे. तर येथील खड्डा सुद्धा उघडाच आहे. दिवस रात्र वर्दळीचा हा रस्ता असून उघड्या खड्यामुळे एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. मात्र पालिकेला याचे काहीच घेणे देणे नसल्याचे यातून स्पष्ट होते.
पावसाळा आता अर्ध्यावर आला असून नाल्यांची सफाई सुरूच आहे. तर मान्सून पूर्व सफाई अभियानात कुठल्या नाल्यांची सफाई करण्यात आली हा एक सवाल येथे उपस्थित होतो. तर दुसरीकडे पालिकेचे अभियान अद्याप सुरूच असल्याने पालिका प्रशासन शहरवासीयांप्रती किती सजग आहे हे सुद्धा दिसून येते. ते काही असो, मात्र नेहरू चौकातील खड्डा बंद करण्यात यावा व येथील गाळ उचलण्यात यावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Abolish the municipal cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.