९९७ कुटुंबांना मिळेल का? राष्ट्रीय बचत पत्र
By Admin | Updated: November 6, 2016 00:50 IST2016-11-06T00:50:09+5:302016-11-06T00:50:09+5:30
महाराष्ट्र सरकारने स्त्री भृ्रणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुरू केली.

९९७ कुटुंबांना मिळेल का? राष्ट्रीय बचत पत्र
नरेश रहिले गोंदिया
महाराष्ट्र सरकारने स्त्री भृ्रणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुरू केली. १ एप्रिल २००७ ला सुधारित योजनेला मंजूरी दिली. या योजनेचा लाभ फक्त दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाना देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी मुलींच्या नावाने डाकघरात राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र तयार केले जाते. परंतु या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या मागील चार वर्षातील ९९७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय बचत पत्र देण्यात आले नाही.
मुलीच्या जन्माचे स्वागत करा असे सांगत मुलींना जन्म देऊन त्यांचे संगोपण करणारे जिल्ह्यात ३३७० दाम्पत्य आहेत. महिलांना सामाजिक जीवनात सुधार करण्याच्या दृष्टीकोणातून एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन केले. त्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासन द्वारे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजनेचा लाभ देण्यात येते. मागील ७ वर्षात ३३७० लाभार्थ्यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत २६७ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही.
सन २०११-१२ या वर्षातील ५१०, सन २०१२-१३ या वर्षातील १५१,सन २०१३-१४ या वर्षातील १४५, सन २०१४-११ या वर्षातील १९१ असे एकूण ९९७ कुटंबाना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र देण्यामागील अडचण विचारल्यास डाकघराकडून प्रत्येक वेळी नविन फॉर्मेट दिला जातो. या योजनेंतर्गत आरोग्य विभागाला प्राप्त होणाऱ्या अर्जाला पाहून प्रमाणपत्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. परंतु डाकघारने या प्रमाणपत्राची संख्या निश्चीत केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. डाकघराच्या आॅनलाईन कामकाजामुळेही त्रास होतो. आरोग्य विभागाकडून लाभार्थ्याची स्वाक्षरी केली जाते. लाभार्थ्याचा पॅनकार्ड, आधार कार्ड व फॉर्मेट नुसार स्वाक्षरीची समस्या असते, असे सांगितले जाते. परंतु निधी अभावीही २६७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा व कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार यामुळे मुलींना जन्म देणाऱ्या कुटुंबाना त्यांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही.
असा मिळतो लाभ
योजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रोख व मुलीच्या नावाने ८ हजार रूपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास व्यक्तीला दोन हजार व दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार असे आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाण पत्रात दिले जाते. या योजनेसाठी लाभार्थी महाराष्टाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांचे नाव दारिद्र रेषेखालील यादीत असावे, पती किंवा पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्य सरकार मान्यता प्राप्त संस्था किंवा नोंदणीकृत रूग्णालयात १ एप्रिल २००७ नंतर होणे आवश्यक आहे.
कन्या जन्मदात्यांना प्रोत्साहन द्या
महाराष्ट्रात पुरूषांच्या जन्मदरामागे मुलींचे कमी प्रमाण आहे. मुलींना जन्माला घातल्यानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्यांसाठी शासनाने सावित्रीबाई फुले योजना अमंलात आणली. परंतु या योजनेला पंगू बनविण्याचे काम आरोग्य विभागातील लिपीकांनी केल्यामुळे मागील चार वर्षातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. कन्या जन्मदात्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेचा लाभ त्वरीत देण्याची गरज आहे.