जलयुक्त शिवारात ९४ गावे
By Admin | Updated: February 9, 2015 23:14 IST2015-02-09T23:14:31+5:302015-02-09T23:14:31+5:30
सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत

जलयुक्त शिवारात ९४ गावे
पाणीटंचाईवर होणार मात : गोंदिया, तिरोडा, सालेकसा, गोरेगावातील सर्वाधिक गावांची निवड
गोंदिया : सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे.
शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणांतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी आणि पिकांना संरक्षीत सिंचन देण्याची व्यवस्था करुन विकेंद्रीत पाणीसाठे या अभियानातून निर्माण करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ४६ गावात ८९ कामे सुरू आहेत. ज्या ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये तिरोडा २४, सालेकसा १३, गोरेगाव १३, गोंदिया २४, देवरी ७, आमगाव ४, सडक अर्जुनी ५ आणि अर्जुनी मोरगाव ४ गावांचा समावेश आहे.
या अभियानांतर्गत कृषी विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात १७ जानेवारीला शेततळे, माता नाली बांध, सिमेंट नाला बांध, भात खाचरे दुरुस्तीची कामे सुरू केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाने गोंदिया तालुक्यातील बिरसोला, गिरोला, गोरेगाव तालुक्यातील लिंबा आणि बोटे, तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे नळ पाणी पुरवठा योजना, गोंदिया पाटबंधारे विभागाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व बीडटोला येथील नवेगावबांध लघू प्रकल्पाचे गोंडउमरी वितरिकेवरील निवडक ठिकाणी अस्तरीकरणाचे काम, जि.प.च्या लघू पाटबंधारे विभागाने साठवन बंधारा दुरुस्ती, ल.पा. तलावांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती, नला सरळीकरण, साठवण बंधारे, साठवण तलावांची कामे सुरू केली आहे.
विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावशिवारातच अडविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासोबतच शेतीसाठी संरक्षीत पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती देणे तसेच ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्जीवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तिवात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्यांची उदा. बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदिंची पाणीसाठवण क्षमता पुन:र्स्थापीत करणे, त्याचप्रमाणे ती वाढविणे, अस्तित्वात असलेल्ळा जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोत्यांचा पाणीसाठा वाढविणे, वृक्षलागवडीस प्रोत्साहन देवून वृक्ष लागवड करणे, पाण्याच्या टाळेबंदाबाबत जनतेत जाणीव-जागृती निर्माण करणे आदींचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)