९० टक्के रोवणी आटोपली
By Admin | Updated: August 12, 2016 01:23 IST2016-08-12T01:23:45+5:302016-08-12T01:23:45+5:30
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

९० टक्के रोवणी आटोपली
पुन्हा पावसाची प्रतीक्षा : १ लाख ६० हजार ४६३ हेक्टरवर धान लागवड
गोंदिया : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ८ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. १ लाख ६० हजार ४६४.४ हेक्टरमध्ये रोवणीचे काम पूर्ण झाले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे उद्दिष्ट होते. यापैकी एक लाख ४९ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात रोवणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम ८४ टक्के पूर्ण झालेले आहे. याशिवाय १० हजार ९७१.८ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत.
८ आॅगस्टपर्यंत गोंदिया तालुक्यातील ३९ हजार ६११ हेक्टरपैकी २८ हजार ४०२.६ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली. गोरेगाव तालुक्यातील १९ हजार ९३१ हेक्टरपैकी १८ हजार ९५०, सालेकसा तालुक्यातील १६ हजार ८८९ हेक्टरपैकी १३ हजार ३२७, तिरोडा तालुक्यातील २४ हजार २४५ हेक्टरपैकी २२ हजार २७०, आमगाव तालुक्यातील १९ हजार २४८ हेक्टरपैकी १६ हजार ९३८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २२ हजार ५८४ हेक्टरपैकी २० हजार ६७२, सडक-अर्जुनी तालुक्यातील १७ हजार २२५ हेक्टरपैकी १५ हजार ७८८ व देवरी तालुक्यातील १८ हजार ४९६ हेक्टरपैकी १३ हजार १४५ हेक्टरमध्ये रोवणीचे कार्य पूर्ण झालेले आहे.
आता रोवणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. थोडेफार कार्य बाकी आहे. ते एका आठवड्याच्या आता पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोंदिया तालुक्यात १८७७.६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात ५०३ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९२६ हेक्टर, तिरोडा तालुक्यात २४४ हेक्टर, आमगाव तालुक्यात २८९ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७३५.२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात ८०२ हेक्टर व देवरी तालुक्यात पाच हजार ५९५ हेक्टरमध्ये आवत्यांचे कार्य पूर्ण करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
इतर पिकांचीही लागवड
जिल्ह्यास धानाचे कोठार संबोधिले जाते. जास्तीत जास्त लोक तांदळाचा आहारात उपयोग करतात. परंतु तांदळासह वरण नसेल तर स्वाद मिळत नाही. जिल्ह्याच्या सहा हजार ०४९ हेक्टर क्षेत्रात तुरचे पीक लावण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात सहा हजार ८५०.३ हेक्टरमध्ये तुरीचे पीक लावण्यात आले. हे उद्दिष्टाच्या ११३ टक्के आहे. मुंगाच्या पिकासाठी २१३ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले होते. प्रत्यक्षात केवळ चार हेक्टरमध्येच मुंग लावण्यात आले आहे. मुंग लागवडीचे काम अद्यापही सुरूच आहे. उडीदच्या पिकासाठी १४४ हेक्टरचे उद्दिष्ट आहे. इतर पिके ३३८ हेक्टरमध्ये लावण्यात येत आहेत. यापैकी ६४.५ हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मकर संक्रांतीमध्ये तिळाला खूप महत्त्व असते. गोड पदार्थ व लाडू बनविण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो. जिल्ह्यात एक हजार २७६ हेक्टरमध्ये तिळाचे पीक लावण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतले. प्रत्यक्ष ७७९.१ हेक्टर क्षेत्रात तिळ लावण्यात आले आहे. हे कार्य ६१ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५६८.२ हेक्टरमध्ये भाजीपाला पीक लावण्यात आले आहे. भविष्यात ऊसाच्या शेतीला अधिक महत्त्व असणार आहे. त्यासाठी ९५८ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. परंतु सद्यस्थितीत २२७ हेक्टर क्षेत्रातच ऊसाचे पीक लावण्यात आले आहे.